
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ठेवीदारांच्या हिताचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी ‘बँक नामांकन फॉर्म’मध्ये वारसदाराची माहिती जोडण्याची सूचना केली आहे. यामध्ये खातेदाराला संबंधित वारसदारांचा ई-मेल आणि फोन नंबर द्यावा लागेल. अलीकडेच संसदेने बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 मंजूर केले आहे. या दुरुस्तीनुसार, आता बँकेतील खातेधारक चार वारसदारांची नावे देऊ शकतात. आरबीआयला सर्व वारसदारांचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर बँकेकडे हवे आहेत.
आरबीआयने यासंदर्भात देशातील बँकांकडून सूचना मागवल्या आहेत. या बदलासाठी बँकिंग कंपनी नामांकन नियम, 1985 मध्येदेखील सुधारणा आवश्यक असेल. जर बँकेकडे चार वारसदारांचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर असतील, तर खातेदाराच्या अनुपस्थितीत बँक त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधू शकते. सध्या खातेधारक वारसदाराचे नाव देतात, परंतु बँकेकडे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे कोणतेही साधन नाही.