माझी लेक गेली, चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका! वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर

वैष्णवीच्या चॅटशी संदर्भात कोणतीही पुसटशीही कल्पना मला दिलेली नाही. त्यावर कोणतेही भाष्य झालेले नाही. याच्या माध्यमातून त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. हगवणे कुटुंबीयांनी केलेले कृत्य आणि मुलीचा घेतलेला बळी याला वेगळी कलाटणी देण्यासाठी आणि गुन्हा लपविण्यासाठी त्यांच्या वकिलाने असे विधान केले आहे, असा आरोप वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी कस्पटे यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

आनंद कस्पटे म्हणाले, ‘आरोपीचे वकील पूर्णपणे चुकीचे बोलले आहेत. मृत्यू झालेल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही. हगवणे कुटुंबीयांनी केलेले कृत्य आणि मुलीचा घेतलेला बळी याला वेगळी कलाटणी देण्यासाठी आणि गुन्हा लपविण्यासाठी त्यांच्या वकिलाने असे विधान केले आहे. पतीने कानाखाली मारले म्हणजे छळ नाही, असे वकिलाचे म्हणणे हास्यास्पद आहे. याचा न्यायनिवाडा कोर्टच करेल. मुलीवर काहीही आरोप करीत आहेत, शिंतोडे उडवत आहेत. तुम्हालाही मुलीबाळी आहेत. माझे लेकरू गेलेलेच आहे. माझ्या मुलीबद्दल वाईट बरळू नका’, असे वकिलाला सुनावत कस्पटे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नीलेश चव्हाणकडे बाळ मागण्यासाठी तीन दिवस आम्ही पाठपुरावा करीत होतो, पण दिले नाही. राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे यांनी उतम बहिरट यांना फोन केला आणि बाळाला घेऊन जाण्यास सांगितले. बाळाची खूप हेळसांड होत आहे. ते रडत आहे. त्याचा व्यवस्थित सांभाळ होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर भाऊ मोहन कस्पटे आणि मेहुणे उत्तम बहिरट हे जयप्रकाश हगवणे यांच्या घरी गेले. ते आणि त्यांच्या मुलीसह मोहन कस्पटे आणि उत्तम बहिरट हे बाळाला आणण्यासाठी वारजे येथे नीलेश चव्हाणच्या घरी गेले. तेथे चव्हाण याने जयप्रकाश यांना पिस्तुलाचा धाक दाखवला असे ते म्हणाले.

हगवणेंनी मुलीची दोन लग्ने मोडली

हगवणे कुटुंबाने मुलीला सतत टॉर्चर केले. लग्नात उभे राहणार नाही, लग्न मोडून टाकेन, अशी धमकी दिली होती. अशीच दोन लग्ने त्यांनी मोडली. हे लग्न जबरदस्तीने करावे लागले. त्यामुळे लग्नात सोने-चांदी, गाडी, चांदीचे ताट, अशा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मी पूर्ण केल्या. माझ्या मुलीची दोन लग्ने मोडण्यासाठी हगवणे कुटुंबीयच कारणीभूत होते. त्याचा लवकरच उलगडा होईल. बाळाला घेऊन जाणारा नीलेश चव्हाणही या कटात सामील आहे, असेही ते म्हणाले.