
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देशाच्या घटनात्मक पदावर बसले आहेत. मोदी-शहांच्या हातात होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नाही, पण या वेळी राहुल गांधींना जनतेने बळ दिले व ते विरोधी पक्षनेते बनले. त्यामुळे त्यांच्या आरोपांच्या फैरी याच तक्रारी असल्याचे मानून निवडणूक आयोगाने ‘स्यू मोटो’ कारवाई करायला हवी, पण मोदी-शहा त्यासाठी परवानगी देतील काय? हाच प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व आपल्या महान निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट हातमिळवणीचा मुखवटा खेचून काढला. फडणवीस वगैरे लोकांचा ‘मेकअप’ त्यामुळे खराब झाला. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याआधी त्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पाहावेत. आता मेकअप पूर्ण उतरला आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी करताच भारतीय जनता पक्षाच्या अंगात आग्या वेताळ संचारला आहे. आग्या वेताळ हे एक पिशाच आहे व सर्व शरीराला आग लावून ते दुसऱ्यांच्या घरांना आग लावीत फिरत असते. हा एक प्रकारचा त्रस्त समंध असतो. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भुरटेगिरीवर हल्ला करताच भाजपच्या अंगात हा वेताळ संचारला आहे. राहुल गांधी यांनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवर आपले मत व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी देशातील अनेक वृत्तपत्रांत लेख लिहून महाराष्ट्राच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने कशी चोरी केली, याची सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदी आणि पंपनीचा दारुण पराभव केला. ‘अब की बार चारसौ पार’चे स्वप्न महाराष्ट्रामुळे हुकले. इतका महाराष्ट्राचा निर्धार पक्का होता. त्यानंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून पन्नास जागाही मिळाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत एवढा उलटफेर कसा होऊ शकतो? हे कुणाला तरी पटेल काय? निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सर्व मॅच फिक्सिंग कसे झाले, हा सर्व प्रकार लोकशाहीला कसा घातक आहे आणि महाराष्ट्रानंतर येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतही हाच ‘मॅच फिक्सिंग’चा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे, याचा खुलासा राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामधून केला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर नियंत्रण राहावे यासाठी निवडणूक आयोगात हवे ते पॅनल करून घेण्यापर्यंत मोदी सरकारने अनेक उपद्व्याप केले. मतदार यादीतले घोटाळे, संध्याकाळी पाचनंतर वाढलेले 60-70 लाख मतदान यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांची
मागणी साधी
आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची एकत्रित डिजिटल मशीन रीडेबल मतदार यादी प्रकाशित करा ही त्यांची एक मागणी आहे आणि महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचे संध्याकाळी पाचनंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा अशी दुसरी मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्याऐवजी निवडणूक आयोगाने भाजपच्या नेत्यांना वकील म्हणून नेमले आहे. राहुल गांधी यांनी लेख लिहिला म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेख लिहून राहुल गांधींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाची वकिली राजकीय पक्षाने करणे ही गंभीर बाब आहे. पुन्हा त्यासाठी फडणवीस यांनी उर्दू शेरोशायरीचा आधार घेतला. महाराष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे दरोडेखोरी असल्याने या दरोडेखोरीचे मुख्य लाभार्थी फडणवीस यांच्या अंगात वेताळ संचारला व ते उर्दूत बोलू लागले.
“ताऊम्र आप यही गलती करते रहे
धूल चेहरे पे थी और
आप आईना पोछते रहे’’
असे फडणवीस राहुल गांधींबाबत म्हणतात. म्हणजे निवडणूक आयोगाच्या बेगाना शादीत नागपूरच्या अब्दुल्लाने दिवाना बनून नाचण्यासारखे आहे. राहुल गांधी यांचे बाण फडणवीस वगैरे लोकांच्या काळजात आरपार घुसले आहेत. निवडणूक आयोगाने संविधानाचा खून केला. महाराष्ट्रात सत्ता मिळावी म्हणून अमित शहा यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक पक्ष फोडले व त्या फुटीस पक्षांतरविरोधी कायद्यातील 10व्या शेड्यूलची पर्वा न करता मान्यता देण्यात आली. हे सगळे घटनाविरोधी आहे. शिवसेना हा मूळ पक्ष धनुष्यबाण चिन्हासह एकनाथ शिंदे या
‘उपऱ्या’ उपटसुंभाच्या हाती
सोपवणे व त्याच पद्धतीने शरद पवारांच्या हयातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या खिशात घालणे हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चोरण्याच्या कटाचाच एक भाग होता. निवडणूक आयोगाने या संघटित गुन्हेगारीत सहभाग घेतला. आता निवडणूक आयोग राहुल गांधींना त्यांच्या आक्षेपांबद्दल लेखी तक्रार दाखल करण्याचा सल्ला देत आहे. स्वतःच्या चेहऱ्यावर उडालेला चिखल साफ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाचे लोकच निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरील घाण साफ करताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडे हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर अनेक तक्रारी आणि आक्षेप नोंदवले गेले आहेत. त्यावरील कारवाईबाबत ढिम्म असलेला निवडणूक आयोग राहुल गांधी यांच्या आरोपांबाबत मात्र ‘‘राहुल यांनी त्यांचे आरोप लेखी स्वरूपात द्यावेत. मग पाहू’’ असा साळसूदपणाचा आव आणत आहे. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देशाच्या घटनात्मक पदावर बसले आहेत. मोदी-शहांच्या हातात होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नाही, पण या वेळी राहुल गांधींना जनतेने बळ दिले व ते विरोधी पक्षनेते बनले. त्यामुळे त्यांच्या आरोपांच्या फैरी याच तक्रारी असल्याचे मानून निवडणूक आयोगाने ‘स्यू मोटो’ कारवाई करायला हवी, पण मोदी-शहा त्यासाठी परवानगी देतील काय? हाच प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व आपल्या महान निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट हातमिळवणीचा मुखवटा खेचून काढला. फडणवीस वगैरे लोकांचा ‘मेकअप’ त्यामुळे खराब झाला. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याआधी त्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पाहावेत. आता मेकअप पूर्ण उतरला आहे.