Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या अपघाताने अनेकांची स्वप्न हिरावून घेतली आहेत. काहीजण लंडनमध्ये नव्याने सुरुवात करणार होते, काहीजण पहिल्यांदा विमानात बसले होते, तर काहीजण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लंडनला निघाले होते. या प्रवाशांमध्ये केरळच्या रंजीता यांचा सुद्धा समावेश होता. ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या रंजीता या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी हिंदुस्तानात आल्या होत्या. हिंदुस्थानात परतून दोन मुलांसोबत कायमचं राहण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं.

Air India Plane Crash – धुरच धूर, काहीच दिसेना… ब्लँकेट गुंडाळत अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला स्वतःचा जीव

केरळच्या पतनमतिट्टा जिल्ह्यातील तिरुवल्ला येथील रहिवाशी असलेल्या रंजीता युकेमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या. दोन लहान मुलांच्या उज्जव भविष्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत होत्या. चांगली संधी मिळाली म्हणून त्या लंडनला गेल्या होत्या. त्या पुन्हा हिंदुस्थानात येण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती. घराचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. त्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पुढे कुटुंबासोबत राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु विमान अपघाताने त्यांच स्वप्न हिरावून घेतलं. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा इयत्ता 10वीमध्ये आणि लहान मुलगी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. रंजीता यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.