साहित्य जगत – दाजी पणशीकरांबद्दल

>> रविप्रकाश कुलकर्णी

गेला महिना, पंधरा दिवस या ना त्या कारणाने आधी दाजींशी, तर कधी त्यांच्या सौभाग्यवतींशी किंवा त्यांच्या मुलाशी बोलणं होत होतं. अर्थात सगळ्या बोलण्याचा केंद्रबिंदू दाजी आणि त्यांच्या पुढील योजना हाच होता. निमित्त होतं माझा `सामना’मधील रविवारच्या पुरवणीतील (20 एप्रिल 2024) `साहित्य जगत’मधला `वाचनाकडे वळण्यासाठी’ हा लेख.

“तुमचं या लेखाकरिता अभिनंदन” इति दाजी पणशीकर. “अहो, याचं श्रेय `ग्रंथदूत’ पुस्तक लिहिणाऱया जॉन गोन्साल्विस यांना द्यायला पाहिजे.” मी म्हटलं.

“पण तुमच्यामुळे हजारो लोकांना या पुस्तकाची ओळख झाली ना? नाहीतर मला कशाला पुस्तकातील ग्रंथदूतांची ओळख झाली असती? तेव्हा तुम्हाला शतश धन्यवाद देतो. तुम्हाला माहीत आहे, मी उगाचंच तोंडदेखलं कुणाचंही चुकूनसुद्धा कौतुक करत नाही.”

दाजी पणशीकरांचा असा सगळा रोखठोक मामला होता. त्यांचा प्रतिवाद करायचा नाही हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवाने मी शिकलो होतो. म्हणून मी काहीच बोललो नाही. पण पुढे दाजी म्हणाले, “ऐका, `खरा कर्ण कोण होता’ ग्रंथाला पन्नास वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अशोक कोठावळे त्याची नवीन आवृत्ती प्रकाशित करत आहेत. तर त्याचा प्रकाशन सोहळा करायचा आहे. त्याच्या जोडीलाच `ग्रंथदूत’मधील मान्यवरांचा सत्कार करावा असे माझ्या मनात आहे. कशी वाटते कल्पना?” अर्थात कल्पना उत्तमच होती. शिवाय करायचे म्हणजे करायचेच हा खाक्या दाजींचा होता हे पण मला माहीत होतेच. पण पुढे दाजी म्हणाले, “हे सगळं तुम्ही सांभाळायचं.”

त्याच सुमाराला ठाण्यातील ज्ञानेश्वर मंदिरात त्यांचे त्यांच्या साहित्यावर भाषण होते. त्याला मी यावे अशी त्यांची इच्छा होती, पण मला ते जमणार नव्हते. नाही जमले. म्हणून दुसऱया दिवशी त्यांच्या घरी फोन केला. तो सौ. पणशीकरांनी घेतला. त्यांना मी “येतो” असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या, “नको, नको! कालच्या कार्पामामुळे ते अगदी थकून गेले आहेत. झोपूनच आहेत.” अशाही परिस्थितीत “कोणाचा फोन आहे?” असं म्हणत दाजींनी फोन घेतला आणि म्हणाले, “जरा थकवा आलाय. तो जाईल. मग तुम्ही या. आमच्या जावयाला… नरेंद्र बेडेकरना यायला सांगतो. सगळे मिळून कार्पामाचं पक्कं करून टाकू.”

मग कळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. दाजींचा मुलगा पामादित्य माझ्याशी बोलला. माझा फोन आहे हे लक्षात येताच दाजी तेथूनच म्हणाले, “त्यांना सांगा, आपल्याला कार्पाम करायचा आहे!” 92 वर्षांच्या या माणसाला ही ऊर्जा येत तरी कुठून होती? पण नंतर सगळे बिघडतच गेले. अशा दाजी पणशीकरांचे 6 जून 2025 रोजी वयाच्या 92व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला ठाण्यात गेलो तेव्हा त्यांच्या संबंधातल्या आठवणी आठवत गेलो.

त्यांचे आणि माझे गोत्र जमले ते लोकलमध्ये. 25-30  वर्षे तरी ते टिटवाळ्याला राहत होते. तेथून दादरला येऊन नाटय़संपदेची व्यवस्था ते बघत असत. यादरम्यान आम्ही केव्हातरी भेटत असू. तेव्हा नाना प्रकारच्या गप्पा होत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्यांचे नाव नरहरी असताना दाजी कसे झाले? तेव्हा ते म्हणाले, “लहानपणी मी अगदीच रोंग्या होतो. त्या सुमारास `किर्लोस्कर’ मासिकात ना.धों. ताम्हणकर यांच्या कथा येत असत. त्याच्या बालनायकाचं नाव होतं `दाजी’ आणि त्याचं ज्या कोणी चित्र काढलं होतं ते पाहून मला सगळे `दाजी’ म्हणू लागले आणि तेच नाव पुढे मला कायम चिकटलं ते चिकटलं. (या लेखाच्या निमित्ताने त्या चित्राचा शोध घेताना लेखक पत्रकार पंकज भोसले याने ते चित्र पाठवून दिले. त्याखाली चित्रकाराचे नाव दिले आहे वि. ना. गोलिवडेकर. काहींनी `दाजी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ शं.वा. किर्लोस्कर यांनी केले आहे असे म्हटले आहे. म्हणून मुद्दाम ही गोष्ट नमूद केली.)

पुढे `आयडियल गप्पा’सारख्या उपामांतून दाजींचा स्नेह वाढतच गेला. दाजी जेव्हा टिटवाळा सोडून ठाण्याला राहायला गेले तेव्हा टिटवाळाकरांनी त्यांचा जो निरोप समारंभ केला त्यालादेखील मला बोलावले होते. त्यांचे हे प्रेम असेच वर्धिष्णू होत गेले. ते किती असावे? दोनेक वर्षांपूर्वी `महाभारत- एक सूडाचा प्रवास’ची नवी आवृत्ती आली तेव्हा त्याचे प्रकाशन माझ्या हस्ते ठाण्याच्या ज्ञानेश्वर मंदिरात झाले. मी संकोचून गेलो होतो, पण हा आपलाच अत्याग्रह होता हे दाजींनी जाहीरपणे सांगितले होते. अशा नाना रंगांच्या आणि ढंगाच्या आठवणी…

बाकी दाजी पणशीकर म्हणजे `महाभारत- एक सूडाचा प्रवास’, `कर्ण खरा कोण होता’, `कथामृतम’ ते अगदी `गानसरस्वती किशोरी अमोणकर : आदिशक्तीचा धन्योद्गार’ यांसारख्या ग्रंथांनी त्यांच्या आठवणी कायम राहणार आहेत. दाजी पणशीकरांना श्रद्धांजली.