
कांतारा चॅप्टर 1 ची जोरदार चर्चा सध्या चित्रपटसृष्टीमध्ये होत आहे. नुकतीच कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना, कन्नड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका जलाशयात बोट उलटली. परंतु अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित 30 जण थोडक्यात बचावले. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली.
शिवमोगा जिल्ह्यातील मस्ती कट्टे परिसरातील मणी जलाशयावर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. जलाशयाच्या उथळ भागात ही दुर्घटना घडली, यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. परंतु शूटींगदरम्यान झालेल्या या अपघातामुळे कॅमेरे आणि इतर चित्रीकरण उपकरणे पाण्यात बुडाली आहेत. हे नुकसान कितीपट झालेले आहे याचा अद्याप कोणताच अंदाज बांधण्यात आलेला नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या तीर्थहल्ली पोलिसांच्या मते, बोटीतील लोक थोडक्यात बचावले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट कांताराची कथा हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून पंचरुली देवता आणि माणूस आणि देवता यांच्यातील संबंध कसे तयार झाले ते पाहणार आहोत. कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट पूर्णपणे लोककथांवर आणि जंगलाशी संबंधित संस्कृतीवर आधारित आहे. यात परंपरा, श्रद्धा, त्याग आणि निसर्गाची खोली यांच्याशी संबंधित एक अनोखा मिलाप पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत आणि ते त्याचे दिग्दर्शनही करत आहेत. याशिवाय मागील भागात दिसणारे सप्तमी गौडा आणि किशोर देखील यावेळी महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यासोबतच काही नवीन चेहरे देखील चित्रपटात सामील झाले आहेत. नवीन पात्रांविषयी मात्र गुप्तता बाळगण्यात आली आहे.
कांतारा चॅप्टर -1 सुरु झाल्यापासून, हा सेटवर झालेला तिसरा अपघात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला ऋषभ शेट्टीचे चाहते सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रार्थना करत आहेत आणि कांतारा चॅप्टर 1 बद्दल लोकांच्या अपेक्षा पूर्वीपेक्षा जास्त वाढल्या आहेत.