
खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून चातकाप्रमाणे वाट पाहूनही पुरेसा पाऊस न आल्याने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 49 हजार 520 हेक्टर क्षेत्रातच पेरणी होऊ शकली. यंदा चार लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे चिंतातुर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 67.3, सावली तालुक्यात सर्वात कमी 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 4 लाख 58 हजार 729 हेक्टर खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत 39.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत 49.520 हजार हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे.
खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. धानाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप पहे टाकले नाही. पुरेसा पाऊस आला नाही तर अंकुर करपून जाईल, याची भीती आहे. त्यामुळे मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, कापूस व सोयाबीन लागवडीचे वेळापत्रक पावसाने बिघडविले. अनेक शेतकरी अजूनही लागवडीचा खर्च जुळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत. पीक कर्ज देण्यास यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची कामगिरी अव्वल राहिली. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका नेहमीप्रमाणे दिरंगाई करीत आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचे काय होणार, याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.