पृथ्वी जाणार, यशस्वी येणार; शॉने मुंबई क्रिकेट सोडले, आता अन्य राज्यासाठी फटकेबाजी करणार

आपल्या वाढलेल्या वजनामुळे आणि तसेच गैरवर्तनामुळे नेहमीच चर्चेत असलेला धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ आता मुंबई क्रिकेट संघ सोडतोय. मुंबई क्रिकेट संघातून संधी मिळत नसल्यामुळे त्याने आपली फटकेबाजी अन्य राज्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेनेही (एमसीए) त्याला तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तीन महिन्यांपूर्वी मुंबई सोडून गोव्याला गेलेल्या यशस्वी जैसवालने माघारी परतण्याचे एमसीएला कळवले होते. त्यानुसार त्याचे मुंबईकर होणे निश्चित मानले जात असून याबाबत आठवडाभराने होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

25 वर्षीय पृथ्वी शॉ गेले वर्षभर आपल्या निराशाजनक कामगिरीमुळे मुंबई संघातूनही बाहेर फेकला गेला आहे. त्याच्या फिटनेसबाबतही एमसीएने वारंवार त्याला वजन कमी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तो एमसीएच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत होता. अखेर पृथ्वीला मुंबई संघातून डच्चू देण्यात आला. त्यानंतर एमसीएने पृथ्वीला विजय हजारे ट्रॉफीच्या संघातही स्थान दिले नाही.

जैसवाल पुन्हा मुंबईकर होणार

मुंबई संघात कथित खटके उडाल्याच्या वृत्तामुळे यशस्वी जैसवालने रागाच्या भरात मुंबई सोडून गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला गोव्याचे कर्णधारपदही देण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र जैसवालने गोवेकर होताच पुन्हा आपण मुंबईकडूनच खेळू इच्छितो, असे पत्र एमसीएला दिले होते. एमसीएने गेले तीन महिने या पत्राचे जैसवालला कोणतेही उत्तर दिले नव्हते. मात्र येत्या बैठकीत त्याच्या पत्राला सकारात्मक उत्तर दिले जाणार असल्याची माहिती एमसीएच्या सूत्राने दिली आहे. त्यामुळे जैसवालला कोणतीही आडकाठी न करता एमसीए पुन्हा मुंबईकर क्रिकेटपटू करेल याबाबत कसलीही शंका नाही.  

आयपीएलमध्ये बोली लागलीच नाही

गेल्या आयपीएल मोसमात अत्यंत खराब फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉला 18 व्या आयपीएल मोसमात त्याचा भुर्दंड सोसावा लागला. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवण्यात आली होती. पण कुणीही त्याच्यासाठी बोलीच लावली नाही आणि पृथ्वीला कुणी विकतच घेतले नाही. तेव्हापासून त्याची कारकीर्द धोक्यात आल्याचे संकेत मिळत होते.  त्यामुळेच त्याने आपल्या कारकीर्दीची नव्याने सुरुवात करण्यासाठी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

पृथ्वीचा नवा संघ कोणता ?

पृथ्वा शॉने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कोणत्या राज्याकडून खेळणार आहे याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यानेही याबाबत एमसीएला कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पृथ्वीचा नवा संघ कोणता असेल हे तूर्तास सांगणे कठीण आहे.