
कसोटी क्रिकेटच्या दीड शतकांच्या इतिहासात एका सामन्यात पाच शतके ठोकल्यानंतर कोणताही संघ हरला नव्हता, पण हिंदुस्थानच्या शुभमन गिलच्या नव्या पर्वात या अनोख्या पराभवाचा नवा अध्यायही जोडला गेला आहे. कसोटीत पाच शतके झळकवूनही पराभूत होणारा हिंदुस्थान पहिलाच दुर्दैवी संघ ठरला आहे. याआधी तब्बल 97 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 4 शतके ठोकूनही हरला होता.
हिंदुस्थानने हेडिंग्ले कसोटी गमावली ती आपल्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि मधला फळीत झालेल्या घसरगुंडीमुळे. हिंदुस्थानने या कसोटीत तब्बल सात झेल सोडले. त्यामुळे इंग्लंडचा संघ पहिल्या डावात हिंदुस्थानच्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला आणि हिंदुस्थानला 100 ते 150 धावांच्या आघाडीला मुकला होता. त्यानंतर पहिल्या डावात हिंदुस्थानची पहिल्या डावात 3 बाद 430 वरून सर्व बाद 471 अशी घसरगुंडी उडाली होती. म्हणजेच 7 फलंदाज केवळ 41 धावांत गारद झाले. म्हणजेच हिंदुस्थानला 500 पेक्षा अधिक धावांचा सहज टप्पा ओलांडता आला असता. तसेच दुसऱया डावातही हिंदुस्थानी संघ 4 बाद 333 अशा सुस्थितीत होता आणि पुढील 31 धावांत 6 फलंदाज ढेपाळले. हेच हिंदुस्थानच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे 5 शतके झळकवूनही पराभवाची झळ हिंदुस्थानी संघाला सोसावी लागली. 1928-29 च्या अॅशेस
मालिकेत मेलबर्न कसोटीत
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आणि दुसऱया डावात प्रत्येकी दोन-दोन शतके झळकवली होती. ही सर डॉन ब्रॅडमन यांचीही पहिलीच कसोटी मालिका होती आणि याच कसोटीत त्यांनी आपले पहिले कसोटी शतक साजरे केले होते. इंग्लंडसमोर चौथ्या डावात विजयासाठी 332 धावांचे आव्हान ठेवले होते आणि इंग्लंडने या आव्हानाचा पाठलाग करत नवा इतिहास रचला.
ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांनी शतके ठोकली होती, तर विजयी इंग्लंडकडून वॉली हॅमंड यांनी पहिल्या तर हर्बर्ट सटक्लिफ यांनी दुसर्या डावात शतक झळकवले. याच इतिहासाची पुनरावृत्ती इंग्लंडने आता केली. हिंदुस्थानच्या पाच शतकांपेक्षा ऑली पोप आणि बेन डकेट यांचीच शतके वरचढ ठरली.
पाच शतके ठोकणारे दोन्हीही विजयी
कसोटी इतिहासात एका डावात पाच शतके केवळ ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन संघांनाच ठोकता आली आहेत. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा तर पाकिस्तानने बांगलादेशचा डावाने पराभव केला होता. त्यानंतर एका डावात चार शतके झळकवणारे संघही विजयी ठरले आहेत. काही मोजके सामने अनिर्णितावस्थेत सुटलेत.