अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य सरकारवर कर्जाचा भार येईल आणि हा प्रकल्प राबवणे अवघड जाणार आहे, असे म्हणणार्‍या अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी मंजूर केले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील 10 हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वळवले जाणार आहेत, असा आरोप करत अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे, असे राऊत म्हणाले. ते गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा भार आहे. अजित पवार सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. राजकीय किंवा ठेकेदारांना मदत होईल आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजप किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला राजकारणात मदत होईल अशा प्रकल्पांना त्यांनी विरोध केला पाहिजे, असे टोला राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.

राज्यावर भार आहे म्हणत लाडकी बहीण योजनेला विरोध करता, आणि काल शक्तिपीठ प्रकल्पासाठी 20 हजार कोटी त्यांनीच मंजूर केले. यातलेच 10 हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वळवले जाणार आहेत. लोकसभा आणि विधासभेलाही हेच झाले. हे नव नवीन प्रकल्प आपल्या लाडक्या ठेकेदारांसाठी काढले जातात. त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50 टक्के दलाली सरकारच्या लोकांकडे येते. ठेकेदारांना आधीच कामाचा शब्द दिला असून त्यांच्याकडून उचल उचललेली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे? 20 दिवसांपूर्वी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले. पण ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचे काम केले हे आपण काल पाहिजे. शक्तिपीठ हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण महाराष्ट्राचे एकच ड्रीम प्रोजेक्ट असू शकेल ते म्हणजे अदानीला हाकलून देणे. महाराष्ट्रासह मुंबईतील सगळ्या योजना अदानी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत. वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शन पर्यंत…महाराष्ट्रात कुणीच नाही का? त्यामुळे यांना हाकलून देणे हे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून फडणवीस ते करणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

लोणीकरांवर निशाणा

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, मोदींमुळे या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. पहलगाममध्ये 26 माय भगिनींचे कुंकू पुसले गेले, ते सुद्धा मोदींमुळे हे सुद्धा लोणीकर यांनी सांगितले असते तर याला सत्याची किनार मिळाली असती. कुलगाममध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या, त्याही मोदींमुळेच… ट्रम्प यांच्यामुळे हिंदुस्थानला युद्धातून माघार घ्यावी लागली, ती देखील मोदींमुळेच… मुंबईतील मोक्याचे भूखंड मराठी माणसाच्या घशातून काढून अदानीला दिले जात आहे तेही मोदींमुळेच… ड्रीम प्रोजेक्टच्या मोदींचे लोक शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहेत, तेही मोदींमुळेच… या देशातील बऱ्याच गोष्टी मोदींमुळे घडत आहेत. पण या राज्याची जनता स्वाभिमानी आहे. पण हे बबनराव लोणीकर सारखे भाजपमधील लोक जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार, मोदींच्या चरणाचे दास समजताहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.

ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा