
जिओ या टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम आणि धाडस होते, असे वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी केले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय सोपा नव्हता, असा खुलासा मुकेश अंबानी यांनी केला. एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी ‘जिओ’मधील गुंतवणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, रिलायन्स इंडस्ट्रीजने 4जी मोबाइल नेटवर्क स्थापण्यासाठी स्वतःचे अब्जावधी डॉलर गुंतविले. मात्र हे पाऊल आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणार नाही. कारण हिंदुस्थानात सध्या डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही, असे त्या वेळी काही विश्लेषकांना वाटत होते, असा खुलासाही मुकेश अंबानी यांनी यावेळी केला.
नेहमीच मोठे धोके स्वीकारले
आम्ही नेहमीच मोठे धोके स्वीकारले आहेत. मी स्वतः बहुसंख्य भागधारक होतो, असे अंबानी म्हणाले. जिओच्या प्रवेशामुळे डेटा सेवांची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली. ज्यामुळे ग्रामीण आणि वंचित भागातील लाखो देशवासीयांना इंटरनेटचा वापर परवडणारा झाला. आजघडीला हिंदुस्थानात 80 कोटींहून अधिक इंटरनेट युजर्स आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनलो आहोत, असेही ते म्हणाले.