देशाचे संविधानच सर्वोच्च! घटनेच्या मूळ चौकटीला संसद धक्का लावू शकत नाही

देशात सर्वोच्च कोण…संसद की संविधान या अधूनमधून उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मोठे विधान केले आहे. देशात संसद, सरकार वा न्यायपालिका सर्वोच्च नाही, तर केवळ देशाचे संविधानच सर्वोच्च आहे. संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. मात्र संसद संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावू शकत नाही, असे परखड मत सरन्यायाधीश गवई यांनी अमरावती येथे व्यक्त केले.

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मायभूमी अमरावतीत आले होते. यावेळी अमरावती जिल्हा वकील संघातर्फे तेथील स्वामी विवेकानंद सभागृहात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या समारंभात बोलताना सरन्यायाधीशांनी संविधानाचे सर्वोच्च स्थान अधोरेखित केले. काही लोक म्हणतात की, संसद सर्वोच्च आहे; परंतु संसद, कार्यकारी मंडळ (सरकार) किंवा न्यायपालिका हे लोकशाहीचे तीन घटक आहेत. हे तिन्ही घटक संविधानांतर्गत येतात. ते सर्वोच्च नाहीत तर केवळ देशाचे संविधानच सर्वोच्च आहे. उच्च न्यायपालिकेचे न्यायाधीश हे संविधानाचे रक्षक आहेत, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.