नीरा स्नानानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याचा साताऱ्यात प्रवेश

>> मोहम्मदगौस आतार

विठूरायाच्या भेटीची आस मनातघेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या माउलींच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी भक्तिमय वातावरणात पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरा स्नानानंतर दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास हैबतबाबांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर खंडाळ्यातील पाडेगाव येथे माउलींसह सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचा आज लोणंद येथे मुक्काम आहे.

गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता वाल्हेनगरीचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरेखुर्द विहीर येथे पोहोचला. तेथे अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीकरिता नीरानगरीकडे मार्गस्थ झाला.

पालखी सोहळ्याने सकाळी साडेदहाच्या सुमारास नीरेत प्रवेश केला. यावेळी पालखी सोहळ्याचे सरपंच तेजश्री काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर हा सोहळा नीरा नदीकिनारी पालखीतळावर सकाळी अकरा वाजता पोहोचला. विसाव्याचे ठिकाण फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

नीरा भिवरा पडता दृष्टी। स्नान करिता शुद्धी सृष्टी।।
अंती तो वैकुंठ प्राप्ती। ऐसे परमेहि बोलिला ।।

नौरा स्नानाकरिता दुपारी दोन वाजता सोहळा मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पुल पार केल्यानंतर माउलींच्या पादुका रथातून उतरवून सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार, आरफळकर यांच्या हातात देण्यात आल्या. पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, अॅड. राजेंद्र उमाप यांच्या नदीकाठावरील दत्तघाटावर दुपारी 2.20 वाजता शाही स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करत हा क्षण याचि देही याचि डोळा अनुभवला. यावेळी भक्तांनी दत्तघाट व नदीपुलावर गर्दी केली होती. त्यानंतर पालखी सोहळ्यातील प्रवासाचा अर्धा टप्पा नीरा येथे पूर्ण झाला.

पुणे जिल्ह्याचा माउलींना भावपूर्ण निरोप

माउलींच्या पालखी सोहळ्यास पुणे जिल्ह्याच्या सीमेवर अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह ग्रामस्थांनी भावपूर्ण निरोप दिला.

सातारा जिल्ह्यात जोरदार स्वागत

आळंदी ते पंढरपूर हा पालखी सोहळा ज्या ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांनी सुरू केला, त्यांच्या जन्मभूमीत सातारा जिल्ह्यात दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास माउलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह प्रवेश केला. पाडेगाव येथे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पाडेगावचे सरपंच रंजना माने, उपसरपंच दशरथ धायगुडे आदींनी पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

“मराठवाड्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यामुळे यावर्षी भाविकांची संख्या वाढली आहे. पुणे ते नीरापर्यंतच्या प्रवासात प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले. मात्र, दिवेघाटात वारकऱ्यांना चालताना कसरत करावी लागली.”

डॉ. भावार्थ देखणे, सोहळाप्रमुख, श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा.