राज्य कबड्डीमध्ये शरद पवार-अजित पवार सामना रंगणार, ‘कबड्डीतील किमयागार’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांचे संकेत

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेमध्येही शरद पवार व अजित पवार या काका-पुतण्यामध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. स्वतः शरद पवार यांनीच हे संकेत दिले आहे. ‘एकेकाळी महाराष्ट्र आणि मुंबईच्या कबड्डी संघटनेचा नावलौकिक संपूर्ण देशात होता. आज मात्र माझ्या कानावर काही गोष्टी ऐकू येतात, त्या चिंता करण्याजोग्या आहेत. संघटना मुठीत ठेवण्यासाठी दुर्दैवाने चुकीचा रस्ता स्वीकारलाय की काय, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे यामध्ये मला लक्ष घालण्याची वेळ आली आहे,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विनायक दळवीलिखित ‘कबड्डीतील किमयागार’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना शरद पवार यांनी हा सूचक इशारा दिला. आपला मुद्दा अधिक विस्तृतपणे मांडताना शरद पवार म्हणाले, ‘मला आनंद आहे की, हा खेळ सुधारतोय. पण अलीकडेच मला काही गोष्टी ठीक ऐकायला मिळत नाहीत. दुर्दैवाने संघटनेमध्ये काहीतरी चुकते आहे. चुकीचा रस्ता काही लोकांनी स्वीकारला की काय, असं चित्र दिसतंय, मात्र त्यामुळे सगळय़ात जास्त किंमत ही खेळाडूंना द्यावी लागते. कबड्डी खेळ विस्तारित होतोय. त्यामध्ये नवीन एक तंत्र पुढे आलेलं आहे. आज टेलिव्हिजनमध्ये ते तंत्र आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामधून खेळाडूंना कदाचित काही मदत होत असेल; पण मूळ कबड्डी हा खेळ जो आहे तसाच आहे. त्याच्यातील जे कसब आहे, त्याच्यावर कुठेतरी आक्रमण होतंय की काय, असं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून याच्यात लक्ष घालावं लागेल. मी जाहीरपणाने कबूल करतो की, अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं. पण एकंदर चित्र ऐकल्यानंतर याच्यात लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील, याची काळजीही घ्यावी लागेल. या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे.’

‘कबड्डीतील किमयागार’ या संदर्भ ग्रंथाचे लेखक विनायक दळवी यांनी पुढील आवृत्तीत आणखी काही दर्जेदार खेळाडूंचा समावेश करून संदर्भ ग्रंथ अधिक समृद्ध करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनी कुमार मोरे यांनी यावेळी कबड्डी आणि देशी खेळांच्या प्रचार-प्रसाराची, आपल्या वडिलांची परंपरा आपण वेगळय़ा पद्धतीने पुढे कायम ठेवली आहे, असे सांगितले.

याप्रसंगी ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त सदा शेटये, शांताराम जाधव, राजू भावसार, अशोक शिंदे, माया आकरे  यांच्यासह  चित्रा नाबर, शैला रायकर, ग्रेटा डिसोजा, सुनील जाधव, जेम्स परेरा, विजया शेलार, सागर बांदेकर आदी आजी-माजी राष्ट्रीय कबड्डीपटूदेखील उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाचे सूत्रसंचालन माजी राष्ट्रीय कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत करत उपस्थितांची मने जिंकली.