
श्रावणाच्या अखेरीस आणि या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यभर तुफान पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील तीन-चार दिवसानंतर गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असताना वरुणराजाही सज्ज झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात पुढील सात दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वायव्य बंगालचा उपसागर, उत्तर ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 ऑगस्टपासून हिंदुस्थानच्या पूर्वेकडील भागात आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोकण तसेच 26 आणि 27 ऑगस्ट रोजी विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारमध्ये पुढील सात दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल; 22 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल; 22 आणि 23 ऑगस्ट रोजी झारखंड, बिहार; 22, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ओडिशा तर 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान छत्तीसगडमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टी आणि केरळ किनारपट्टीवर 26, 27 ऑगस्ट रोजी तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PrUAkm3QvF
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 22, 2025