
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचा चिखल झाला असून पुराचे पाण्याने शेतीतील मातीही वाहून गेली आहे. अस्मानी संकट असताना सरकारचाही सुलतानी कारभार सुरू आहे. अद्यापही काही भागात पंचनामे सुरू झालेले नाही. तसेच लाखोंचे नुकसान झालेले असतानाही तुटपुंजी मदत मिळत आहे. यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा धीर खचला असून त्यातूनच आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. आताही पुरामुळे झालेल्या नुकसान पाहून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळकोट तालुक्यात घडली आहे.
जळकोट तालुक्यातील मौजे बेळसांगवी येथे तरुण शेतकऱ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मारोती संग्राम रायकवाडे (वय – 32) या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला घेतला. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून त्याचा धीर खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती मिळत आहे.