Powai Hostage Case – मुंबईत थरारक घटना! पवईतील स्टुडिओत २० ते २२ मुलांना ओलीस ठेवलं, पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुंबईत पवईमधील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. या घटनेने संपूर्ण यंत्रणा हादरली होती. यानंतर पवई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तसेच ओलीस ठेवलेल्या सर्व मुलांची सुरखरूप सुटका केली आहे. दुपारी १ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत हे ओलीसनाट्य सुरू होते. ओलीस ठेवलेल्या मुलांना ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते. १५ वर्षांच्या आतील ही सर्व मुले आहेत.

पवईत एल अॅन्ड टी गेट ५ च्या समोर रा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत रोहित आर्य नावाच्या आरोपीने सर्व मुलांना ओलीस ठेवले होते. या आरोपीने एक व्हिडिओ जारी करत धमकीही दिली होती. माझ्या काही मागण्या आहेत आणि त्यासाठी काही जणांशी मला बोलायचे आहे. त्यासाठी मी मुलांना ओलीस ठेवले आहे, असे त्याने सांगितले. जर कुठली कारवाई केली तर या स्टुडिओला आग लावेन आणि या घटनेत मुलांचाही जीव जावू शकतो, अशी धमकी आरोपी रोहित आर्यने व्हिडिओतून दिली होती. यामुळे पालकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपी रोहित आर्य याचे पैसे सरकारकडे थकले होते. काही प्रोजेक्टमध्ये त्याने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. पण यात त्याचे नुकसान झाले आणि त्यासाठी तो सरकारला जबाबदार धरत होता. यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी त्याने हे भयंकर पाऊल उचलले, असे सांगण्यात येत आहे. पण यामुळे २० ते २२ मुलांचा जीव धोक्यात आला होता. जाहिरातीत काम देण्याच्या नावाखाली मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी वेळीच पाऊल उचलत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

मिंधे गटाचे दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना आरोपी रोहित आर्य याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केले होते. सरकारने २ कोटी रुपये थकवल्याचा त्याचा आरोप होता. PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप आरोहित आर्य याने केला होता.