एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

विमान हवेत असतानाच बॉम्बच्या मेल आला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर विमान ताबडतोब आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. बॉम्ब पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मेल पाठवणाऱ्यांचा अधिकारी शोध घेत आहेत.

याप्रकरणी एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने निवेदन जारी केले आहे. वाराणसीला जाणाऱ्या एका विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. प्रोटोकॉलनुसार, सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित सुरू करण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सर्व अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमान ऑपरेशनसाठी सोडण्यात येईल, असे एअरलाईन कंपनीने निवेदनात म्हटले आहे.