खामेनी यांच्या हत्या प्रकरणी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, पंतप्रधान मोदींच्या मौनावर राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या गंभीर विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनामुळे जागतिक स्तरावर हिंदुस्थानची पत घसरत असल्याचे ते म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पंतप्रधान मोदी एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचे समर्थन करतात का? त्यांनी म्हटले की, इराणवरील इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले तसेच इराणकडून आखाती देशांवर झालेले हल्ले या दोन्ही गोष्टी निषेधार्ह आहेत. हिंसा हा कोणत्याही प्रश्नाचा मार्ग असू शकत नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हा संपूर्ण क्षेत्राला महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहे. ज्यामुळे तिथे राहणाऱ्या सुमारे एक कोटी हिंदुस्थानींसह कोट्यवधी लोकांचे भविष्य धोक्यात आले आहे.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी स्पष्टपणे बोलण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण हे नेहमीच सार्वभौमत्व आणि वादांच्या शांततापूर्ण निराकरणावर आधारित राहिले आहे. पंतप्रधानांच्या मौनामुळे जगामध्ये हिंदुस्थानची प्रतिमा मलिन होत आहे.”