
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ‘शिवालय’ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही विविध विषयांवरून सरकारवर हल्ला चढवला. सरकार महाराष्ट्रद्वेष्टे असल्याने चहापानाच्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे पाप आहे, असे ते यावेळी म्हणाले.
‘डाग अच्छे है’ ही भाजपची टॅगलाईन झाली आहे. भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक मंत्री बसले असून ते चहापानाला जातील. मुख्यमंत्री त्यांचे चेहरे पाहतील आणि त्यांना आठवण होईल की मी यांच्यावर आरोप केले होते. कुणाला जेलमध्ये टाकणार होते, कुणावर काय आरोप लावले होते आणि कुणाच्या मागे ईडी लावली होती. हे भ्रष्टाचारी सराकर असून अनेक मोठ मोठे घोळ समोर येत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात भाजप आणि दोन गद्दार गँगच्या महायुती किंवा महाझुटी सरकारमध्ये तीन पक्षांची तीन दिशेला तोंड आहेत. बंगले, गाड्या, पालकमंत्री, पीए, निधीवरून त्यांची एकमेकांमध्ये भांडणे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर फंड चोरल्याचा आरोप होत आहे. कदाचित त्यांना अजून थोड्या समन्वयाची गरज आहे. चहापानाच्या कार्यक्रमात ते एकमेकांचे तोंड बघतील, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, अकरावी प्रवेशाच्या यादीतही मोठा गोंधळ आहे. यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठले कॉलेज कुणाला द्यायचे यासाठी मंत्री दादा भूसे यांनी भ्रष्टाचार केलाय की पैसे खाल्ले हा प्रश्न आहे. याच दादा भूसे यांनी पहिल्याच्या विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय घेतला आणि अंमलबजावणीचा जीआरही काढला. याच दादा भूसे यांनी भ्रष्टनाथ शिंदेंसाठी दीड वर्ष एमएसआरडीसी खाते सांभाळले होते आणि आता समृद्धी महामार्गाची नदी झालीय, त्यावर खड्डे पडले आहेत.
रणनीती ठरली! पावसाळी अधिवेशनानिमित्त महाविकास आघाडीची बैठक पार, सरकारच्या चहापानावर बहिष्कार
एवढेच नाही तर मुंबई-पुणे महामार्गावर साडे सहा गाड्यांना चुकीचा फाईन लावून साडे बारा कोटींचा घोटाळा केला. गायमुख-ठाणे उन्नत मार्ग-बोगद्याच्या टेंडरमध्येही तीन हजार कोटींचा घोटाळा केला. लाडक्या कॉन्ट्रॅक्टर स्कीममधून काढलेले पैसे राजकीय नेत्यांना फोडण्यासाठी वापरले. याचमुळे भ्रष्टनाथ शिंदेंना सूरत, गुवाहाटी मार्गे भाजपच्या वाशिंगमशीनमध्ये उडी मारावी लागली, असा जबरदस्त घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात कुणी मंत्री हॉटेल घेण्याचा प्रयत्न करतोय, तर कुणाच्या ड्रायव्हराल कोट्यवधींची प्रॉपर्टी फुकटात मिळतेय. भ्रष्टनाथांच्या एसंशिं गटामध्ये अशा अनेक प्रकरणं समोर येत आहेत. हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे भाजपचे ब्रिदवाक्य होते. पण आता अनेक डागी लोक सोबत घेतले आहेत. कुणाल भ्रष्टाचारावर, तर कुणावर मर्डरच्या केस आहेत. युती धर्मामुळे मुख्यमंत्री हात बांधून, डोंळे बांधून बसले आहेत का? असा सवाल करत हे विषय अधिवेशनात उपस्थित करणार आणि मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राला उत्तर द्यायला लावणार, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.