
सध्याची लाइफस्टाइल आणि त्या अनुषंगाने होणारे आजार हा आता चिंतेचा विषय झालेला आहे. वारंवार होणारी जागरणं खाण्यापिण्याच्या वेळा यामुळे आपल्याला पित्त होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पित्तामुळे होणारी डोकेदुखी आणि येणारे ढेकर हे तर अधिकच त्रासदायक होत आहे. त्यामुळेच या पित्तावर आपण कायमचा उपाय शोधणेही आता गरजेचे आहे.
धावत्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा या खूपच अनियमित झालेल्या आहेत. आपल्याला कामानिमित्ताने सतत बाहेर राहावे लागत आहे. त्यामुळे तासनतास बाहेर राहावे लागत आहे. बाहेर राहिल्यामुळे, भूक भागवण्यासाठी सुद्धा आपण बाहेरचे जे उपलब्ध असेल ते पदार्थ खातो. त्यामुळेच मग अॅसिडिडी, गॅसेस होणं यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. वारंवार गॅस होण्यामुळे अनेकदा आपल्याला नकोसे होते. यावरच आपण पाहणार आहोत काही खास घरगुती टिप्स .
जेवणानंतर गुळाचे करा सेवन
आपल्या प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळेमध्ये सध्या खूप मोठा बदल झालेला आहे. अवेळी जेवणामुळे अन्नपचन होत नाही. पूर्वीच्या काही जेवणानंतर शतपावली करणे हे क्रमप्राप्त असायचं. सध्या मात्र जेवुन झोपतोय कधी असं होतं. म्हणूनच दररोज जेवण झाल्यानंतर, गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होण्यास मदत होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.
ओवा सोबत हवाच
ओवा हा आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असतोच. ओवा हा केवळ स्वयंपाकातील पदार्थांमध्ये नाही तर, इतर अनेक गोष्टींवर गुणकारी मानला जातो. पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर, हातावर ओवा घेऊन तो कुसकरुन खायला हवा. असे केल्याने, ओव्याचा सुवास आणि दाताखाली ओवा आल्याने, आपल्याला आराम मिळतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओवा आपण कुठेही जाताना सोबत ठेवु शकतो. त्यामुळे ओवा खाण्यासाठी कुठलाही आळस करायला नको.
लिंबू आले महत्त्वाचे
पोटातील बहुतांशी विकारांवर काळा चहा हा हमखास प्यायला जातो. चहामध्ये लिंबू पिळून पिल्याने, खूप मोठा फरक पडतो. लिंबाच्या जोडीला चहामध्ये आले टाकल्यास, पित्ताचा त्रास हा खूप कमी होतो. तसेच आपण आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले, त्याचा रस प्यायल्यास आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.
बहुमोली बडीशेप
जेवणानंतर अन्नपचन होण्यासाठी बडीशेप खाणे हे अधिक उत्तम. बडीशेप किंवा खाऊचे पान जेवणानंतर खाल्ल्याने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच बडीशेप ही मुखशुद्धीसाठी सुद्धा एक उत्तम उपाय आहे. 1 कप उकळलेल्या पाण्यात 1 चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात 3 वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)