Air India Plane Crash – 10,33,02,22,788 अबब! एवढा अपघात विमा!!

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. इतका मोठा विमान अपघात नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती संपूर्ण तपास केल्यानंतर समोर येईल. या दुर्घटनेत ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांचा एअर इंडियाने विमा काढलेला आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनी 120 मिलियन म्हणजेच जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा विम्याचा दावा ठोकू शकते. हा विमा आजपर्यंतच्या विमान दुर्घटनेतील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम असू शकतो, असे बोलले जात आहे. एअर इंडिया कंपनी या अपघाताच्या विम्याचा दावा करेल त्याची रक्कम 10,33,02,22,788 रुपये असू शकते. एअर इंडियाच्या प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांमध्ये न्यू इंडिया इन्शूरन्स आणि टाटा एआयजीचा समावेश आहे. कोणतीही विमान कंपनी ही हुल इन्शुरन्स, स्पेअर पार्ट्स इन्शुरन्स आणि कायदेशीर जबाबदारीसाठी विमा काढतात. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत एअर इंडिया या तिन्ही गोष्टीसाठी दावा करू शकते. विमानाचे नुकसान आणि प्रवाशांचे मृत्यू या दोन्ही गोष्टी विमा कव्हरमध्ये येतात.

जीआयसी रेचे सीएमडी रामस्वामी नारायण यांच्या म्हणण्यानुसार, विमानाचे सर्व नुकसान होणे आणि लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रकारचे विमा दावे केले जातील. अशा नुकसानीचा थेट परिणाम अनेक इन्शुरन्स कंपन्यांवर पडतो. भारतीय एअरलाइनशी जोडलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विमा दावा असेल, असे एलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्सचे बिझनेस हेड सौरव बिस्वास यांनी म्हटले.  याआधी भारतात 2010 साली झालेल्या मंगळुरूमधील बोइंग 737 विमान अपघातात 158 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 2020 मध्ये कोझिकोडमध्ये झालेल्या दुर्घटनेत 21 प्रवासी ठार झाले होते. या दोन्ही अपघातांचा एकूण विमा 60 ते 70 मिलियन डॉलरदरम्यान होता. अहमदाबाद दुर्घटनेत दुप्पट प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे विम्याची रक्कमसुद्धा दुप्पट होऊ शकते.

एअर इंडियाने ज्या कंपन्यांकडून विमान केला आहे. त्यामध्ये टाटा एआयजी ही मुख्य कंपनी होती. न्यू इंडिया इन्शुरन्ससारख्या अन्य कंपन्यांनीही यामध्ये भाग घेतला होता. या विमानाचा विमा लंडनच्या बाजारात करण्यात आला होता. याला ग्लोबल रिइन्शुरन्स प्रोग्राम असे म्हटले जाते. यातील जास्तीत जास्त जोखीम विदेशी विमा कंपन्यांना दिली जाते. भारतातील कंपन्या टाटा एआयजी, न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, यूनायटेड इंडिया, ओरिएंटल आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरलने 10 टक्क्यांपेक्षा कमी जोखीम पत्करली आहे.