
>> वर्षा चोपडे
असे म्हणतात, ज्येष्ठ नागरिक, मग ती स्त्री असो वा पुरुष ह्या अनुभवाचे अनमोल पुस्तक असतात. अनेक हिवाळे, पावसाळे बघून त्या आपल्या परिवारासाठी चंदनासारख्या झिजत असतात. हिंदुस्थान असो वा विदेश ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात आनंददायी जीवन मिळणे त्यांचा मूलभूत अधिकार आहे. वृद्ध व्यक्तींचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी 15 जून हा जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा इतिहास 1988 पासून सुरू आहे. त्याची अधिकृत स्थापना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी केली होती. त्यांनी 19 ऑगस्ट 1988 रोजी 5847 च्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती. वृद्धांवरील अत्याचार ही एक समस्या आहे जी विकसनशील आणि विकसित दोन्ही देशांमध्ये अस्तित्वात आहे, परंतु सामान्यत जागतिक स्तरावर ती कमी नोंदवली जाते.
हिंदुस्थानात, ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध व्यक्ती, विशेषत सोयीनुसार नोकरी करणारे बरेच जेष्ठ नागरिक मिळतील. वृद्ध अवस्थेत मानसिक स्वास्थ्य, आरोग्याची काळजी, पोषक आहार, सुरक्षित आहार, कुटुंबाचा आधार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आदर जरुरी असतो. सरकारी नियमानुसार निवृत्त होणे म्हणजे आयुष्य संपले असे नाही. या निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याचा खूप अनुभव असतो. नोकरी, व्यवसाय याचा प्रदीर्घ सराव असतो. जुने ते सोने असे म्हणतात ते काही खोटे नाही. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारे वृद्ध म्हातारपणी फक्त मुलांच्या प्रेमाचे भुकेले असतात. काही आपल्या म्हातारपणाची सोय लावून ठेवतात तर काही मुलांवर विसंबून असतात. पैशासाठी मुलांसमोर हात पसरणे व अपमानित होणे याला इलाज नसतो. जे आईवडील मुलांसाठी आपले आयुष्य खर्ची घालतात ते वृद्ध झाल्यावर त्यांच्या मुलांनी आईवडिलांची काळजी घेणे गरजेचे असते. देवाला नैवेद्य दाखवल्यावर उपाशी मायबापाला पोट भरून खाऊ घालणे जरुरी असते. अनेक वृद्ध लोक निवृत्तीनंतर आपले छंद जोपासतात. हास्यक्लब, योगा, सहली, देवधर्म आणि इतर आवडत्या गोष्टीत वेळ घालवतात. पण गृहिणी, मजूर आणि शेतकरी त्यांचे काय? त्यांना तर निवृत्तीच नसते. काही मजुरी करणारे मजूर अतिश्रमाने अनेक रोगास बळी पडतात व मृत्युमुखी पडतात. अनेक लोकांचे त्यांच्या मुलांचे लग्न झाल्यावर सुनेसोबतचा व्यवहार त्यांचे म्हातारपण गोड किंवा कडू करतो. हेही सत्य आहे. मुलाच्या लग्नानंतर सुनेचा छळ करणारे वृद्ध पतिपत्नी आपल्या कर्माची फळे भोगतात आणि सुनेला सांभाळून घेणारे तिच्या आधारास पात्र ठरतात. काही व्यसनी आणि अविचारी पोटची मुलेही या वृद्धांचा छळ करतात. संपत्तीसाठी वाट्टेल त्या थराला जातात तेव्हा माणुसकी संपली असे वाटते. पैसा झाला मोठा असे आपण ऐकतो, पण वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर जेव्हा वृद्धांवर अत्याचार झाल्याचे ऐकतो-वाचतो तेव्हा मन सुन्न होते. हिंदुस्थानात विपुल प्रमाणात वृद्धाश्रम आहेत. त्याची गरज का पडली? हाही विषय गंभीर आहे. वृद्धाश्रमात कुणालाही जाणे आवडत नाही. मनुष्याला शेवटच्या दिवसात आपले कुटुंबीय जवळ असावे असे वाटणे नैसर्गिक आहे. नातवंडासोबत लहान होऊन खेळणे यासारखा आनंद नाही. पण त्यासाठी कुटुंबीय आणि वृद्ध यांचे एकमत असणे गरजेचे आहे. प्रेम आणि आदर देता आणि घेता यायला हवा. आपण बरेचदा वाचतो परदेशात गेलेली मुले आईवडिलांना विचारत नाही. पण आपल्या देशातसुद्धा तीच परिस्थिती आहे. वृद्धाश्रम ही गरज बनली आहे. आमच्यामुळे कुणाला त्रास नको ही भावनाही त्यास कारणीभूत आहे. जिथे विश्वासाची अपेक्षा असते तिथेच वृद्ध व्यक्तीला हानी किंवा त्रास होतो. जवळचे नातलग, परिवारातील लोक किंवा परके कुणीही अविचारी हिंसक वृत्तीचे लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा ज्येष्ठ वृद्ध व्यक्तींच्या आजारी आणि चिडचिडेपणाला कंटाळून त्यांच्यावर अत्याचार करतात. बरेचदा वृद्ध व्यक्ती उगाचच कटकट करीत असतात व मुलामुलींच्या वैयक्तिक आयुष्यात वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करीत असतात. त्यामागे काळजी ही भावना असली तरी ते कुटुंबातील पुरुष आणि महिलांना खपत नाही. त्यामुळे घरातील वातावरण बिघडते व भांडणे आणि हिंसाचारास सुरुवात होते. बरेचदा सुनांचा छळ होतो. त्यामुळे सासू-सासऱयाविषयी त्यांचे मन कलुषित होते. मग त्यांना ज्येष्ठ नागरिक असलेले सासू-सासरे नकोसे वाटतात. यावर उपाय एकच एकमेकांना समजून घेणे व एकमेकास त्रास होणार नाही असे वागणे होय. बऱयाच घरात सुनेवर वाईट भावना ठेवून अत्याचार होतात. हुंडय़ासाठी छळ होतो. अशा वेळी घरच्या सदस्यांची साथ देणारे ज्येष्ठ नागरिक म्हातारपणी सुनेच्या तिरस्कारास बळी पडतात. सुनाही बऱयाचदा अविचारी असतात. अशी अनेक कारणे असतात तरी वृद्धांवर अत्याचार करणे गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्याने शिक्षेची तरतूद केली आहे. केवळ शहरात राहणारे वृद्ध अत्याचाराचे शिकार होतात असे नाही तर गावांमध्येही हे प्रमाण वाढले आहे. वैचारिक मतभेद, कुसंस्कार, शिक्षण असूनही मानवताहीन तुच्छ विचार, हिंसक रागीट स्वभाव आणि सामाजिक बेपर्वाई यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होत आहेत. अनेकदा अत्याचार होऊनही वृद्ध नागरिक लोकलाजेमुळे बोलत नाहीत आणि पोलिसात तक्रार करीत नाहीत. अनेक गुन्हे घडतात, पण लपवलेही जातात. देशात लोकसंख्येमुळे मानवी जीवनास किंमत राहिली नाही. सामाजिक मूल्यांची घसरण हेही कारण आहेच. अंध, अपंग ज्येष्ठ नागरिकांना जपणे गरजेचे आहे. अनादर, शाब्दिक छळ, आर्थिक शोषण, मारहाण आणि वृद्ध स्त्रियांवरील अवांछित लैंगिक अत्याचार हेदेखील समाजात प्रचलित अत्याचार आहेत. अपमानास्पद भाषा किंवा असभ्य बोलणे हा वृद्धांना सहन करावा लागणारा सर्वात सामान्य प्रकार आहे. कायदा आपले काम करतो, पण तक्रार करणेही गरजेचे आहे. समाजात, वृद्धांच्या अत्याचार व दुर्व्यव्हार अशी प्रकरणे नोंदवण्यासाठी विविध यंत्रणा आहेत. जसे की पोलीस हेल्प लाइन. पण त्याचाही वापर केला जात नाही. शेवटी मुलगा आपलाच आहे आणि त्याच्याकडे राहायचे आहे, त्यामुळे अन्याय सहन केला जातो.
संपत्तीसाठी अनेक गुन्हे घडतात त्यात बरेचदा जवळचे नातलग सामील असतात. त्यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अन्याय बघत बसणे व त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकण्यात लोकांना धन्यता वाटते. कायदे अनेक असले तरी सर्वात अलीकडील म्हणजे 2007 चा MWPSC कायदा अर्थात पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल आणि कल्याण कायद्यानुसार, स्वतच्या उत्पन्नातून स्वतचे पालन पोषण करू शकत नसलेले पालक आणि आजी-आजोबा 10,000 पर्यंत भरणपोषण मागू शकतात. कायद्यात सरकारला 150 वृद्धांना सामावून घेण्यासाठी वृद्धाश्रम उघडण्याची आणि व्यवस्थापित करण्याची तरतूद आहे. कायद्याच्या कलम 24 मध्ये पालकांना किंवा वृद्धांना सोडून देणाऱयांना 5000 रुपये दंड किंवा 3 महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. हा लेख लिहिण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की, ज्यांनी आपल्याला वाढवले आहे त्यांच्याबद्दल आपण इतके बेफिकीर का आहोत? दुर्लक्ष, असंवेदनशील वृत्ती, वाढती आर्थिक, आधुनिक विचारसरणी आणि अवलंबित्व यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. सरकार विविध पातळ्यांवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विविध स्वयंसेवी संस्थादेखील काम करतात आणि त्यांना मदतीचा हात देतात. परंतु गैरवापर कमी करण्यासाठी काही पावले उचलणे आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षणाने तरुणांना संवेदनशील बनवून पिढय़ांमधील संबंध मजबूत करायला हवे.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल
सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)