स्वयंपाकघर – थ्री चिअर्स

>> तुषार प्रीती देशमुख

यशस्वी गोष्ट घडण्यासाठी ती योग्य वेळ यावी लागते असे म्हणतात, पण ती सकारात्मक गोष्ट घडण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागते ना! नुसत्या वेळेची वाट पाहून चालत नाही. असेच काहीसे खाद्य संस्कृतीशी निगडित असलेल्या ‘थ्री चिअर्स’ या यूटय़ूब चॅनेलच्या भक्ती गोखले हिने तिच्या आयुष्यात अनुभवले.

भक्तीची आणि माझी ओळख जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर सर यांच्यामुळे झाली. तिला काही शेफ्सवर लेख लिहायचे होते. त्यासाठी विष्णू सरांनी तिला माझे नाव सुचवले. फोन करून ती थेट माझ्या रेस्टॉरंटमध्ये भेटायला आली व माझा प्रवास जाणून तिने माझ्यावर लेख लिहिला. त्याच वेळी मलाही तिचा खडतर प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली. आम्ही भेटलो तेव्हा भक्ती संकटांनी तिच्यासाठी घातलेल्या पायघडय़ांवर सगळे काही सहन करत हसतमुखाने जिद्द न हरता पुढे चालत होती.

भक्तीचा जन्म एकत्र कुटुंबातला व गिरगावच्या चाळ संस्कृतीमधला. भक्तीची आई संध्या ओक, काकू कल्पना व सुमन ओक या तिघीजणी घरातील स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळायच्या. त्यामुळे मुलांची चंगळच होती. तिघींकडून वेगवेगळे पदार्थ त्यांना खायला मिळायचे. भक्तीच्या आत्या आशा भिडे या तर निगुतीने स्वयंपाक बनवायच्या. बटाटय़ाचा एखादा पदार्थ करायचा असल्यास बटाटय़ाच्या सालीपासूनही पदार्थ बनवला जायचा. त्यामुळे कोणताही खाण्याचा जिन्नस वाया जाऊ नये यासाठी त्या त्याचा उत्तम वापर करायच्या. तिच्या आजी सुशीला ओक व कमल जोशी यादेखील उत्तम सुगरणी. भक्तीचे वडील जयंत ओक हे दूरदर्शनसाठी अनेक कार्यक्रम सादर करायचे. ‘गप्पागोष्टी’ हा त्यांचा स्वतचा कार्यक्रम! तेही एक उत्तम पदार्थ बनवणारे. त्यातील प्रामुख्याने पदार्थ सांगायचे तर वर्षभर टिकून राहणारे लिंबाचे लोणचे व बटाटावडा. लहानपणापासूनच भक्तीची खाद्य संस्कृतीशी नाळ जोडली गेली होती.

शिक्षण झाल्यानंतर भक्ती पत्रकारितेत नोकरी करू लागली. 2006 साली लग्न होऊन ती नागपूरला गेली. वैदर्भीय पदार्थ तिच्या पसंतीचे ठरले. अनेक वर्षे संकलनाचे काम केल्यानंतर पत्रकारितेमध्ये तिला स्वतचं बीट (विषय) मिळालं. तिने खाद्य संस्कृतीशी निगडित लेखन व माहिती हा विषय निवडला.

19 मे 2012 ला भक्तीला मुलगा झाला, ती माहेरी मुंबईला असल्यामुळे तिचे पती तिला व मुलाला पाहण्यासाठी दुसऱयाच दिवशी नागपूरहून मुंबईला येण्यासाठी निघाले असता ट्रेन अपघातात त्यांचा मृत्यू झाला. भक्तीला तिच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांनी ही बातमी सांगितली तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळले. या कठीण प्रसंगाच्या वेळी तिला तिचे आई-वडील व तिचा भाऊ जयेश यांनी आधार दिला.

भक्ती खूप खचली होती. पुढील आयुष्य कसे जगायचे? हा प्रश्न तिच्या पुढे होता, पण त्यातून मार्ग काढून ती पुन्हा तिच्या पत्रकारितेत रुजू झाली आणि पुन्हा जोमाने काम सुरू केले. तिने तिच्या लेखनाचा विषय खाद्य संस्कृतीशी निगडितच ठेवला. पारंपरिक असो वा नावीन्यपूर्ण पदार्थ, महाराष्ट्रातल्या अनेक प्रांतांतले असो वा विदेशातले, घरगुती पदार्थांपासून ते अगदी सप्ततारांकित हॉटेलचे पदार्थपर्यंत   तिने अनेक सदरे लिहिली. हे सर्व करत असताना घर,  मुलगा व आई-वडिलांच्या वयानुसार त्यांची तब्येत हे सगळे सांभाळत होती. तिची खूप दगदग व्हायची, चिडचिड व्हायची. तरीसुद्धा तिने संयम ठेवून वाटचाल करायचे  ठरवले. आपल्याला समजून घेणारा, आवडीनिवडी जोपासू देणारा, काळजी घेणारा, मुलाला वडिलांची माया देणारा साथीदार मिळावा यासाठी तिने अनेक प्रयत्न केले. म्हणतात ना, एखाद्या परिस्थितीला झुंज देणाऱया स्त्राrकडे समाजातील काहींचा  पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच राहिलेला आहे. तिलाही तसेच अनुभवायला मिळाले, पण तिने कुशाग्र बुद्धीने, संयमाने प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळले.

2021 साली तिच्या आयुष्यात तिला हवा असलेला परिकथेमधला राजकुमार आला. पुण्यातील शशीभूषण गोखले यांच्याबरोबर भक्तीचा विवाह झाला. शशीभूषण गोखले यांचा मुलगा श्रीराम व भक्तीचा मुलगा नीलय असे त्यांचे कुटुंब तयार झाले. भक्तीच्या सासूबाई ज्योती गोखले उत्तम सुगरण. अनेक वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल त्यांच्या स्वयंपाकघरात कायमच असायची. सासूबाईंकडून अनेक पदार्थ ती शिकली. पुण्यात तिची नोकरी काही महिने तिने टिकवून ठेवली, पण तिला स्वतचे यूटय़ूब चॅनेल सुरू करायचे होते. या सर्व प्रक्रियेमध्ये तिला तिच्या पतीने साथ दिलीच, पण तिचे सासरे विद्याधर गोखले यांनीदेखील तिला मार्गदर्शन व सहकार्य केले. तिच्या मनात असलेल्या यूटय़ूब चॅनेलचे नाव काय असले पाहिजे, यापासून ते अगदी तिला एखादा व्हिडीओ अपलोड केल्यावर किती व कशा प्रतिक्रिया येतील, हेदेखील ते सांगायचे. ज्यावेळी विषय आर्थिक बाजूकडे येऊन थांबला त्यावेळी भक्तीच्या पतीने आर्थिक पाठबळाची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर मुलांचीही जबाबदारी स्वीकारून तिला “जोमाने कामाला लाग’’ असे सांगितले.

2022 साली ‘थ्री चिअर्स’ या नावाने भक्तीच्या यूटय़ूब चॅनलचा श्रीगणेशा झाला. फूड बिजनेस प्रमोशन व पदार्थाच्या सादरीकरणाचे व्हिडीओ तिने अपलोड करायला सुरुवात केली. पाहता पाहता तिच्या यूटय़ूब चॅनलला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यातही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. एक व्हिडीओ तयार करायचा म्हटला की, त्यासाठी लागणारी मेहनत, टीम अत्यंत महत्त्वाची असते. ती सुरुवातीला काहीजणांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या सवडीनुसार ते व्हिडीओ बनवण्यापासून ते एडिट करून अपलोड करण्यापर्यंत तिला प्रतीक्षा करावी लागत होती. शेवटी तिने संपूर्ण प्रक्रिया शिकून त्याचा कोर्स केला. तिच्या मोबाइलवर व्हिडीओ शूट करून स्वत एडिट करून मग ती ते अपलोड करू लागली. या सर्व प्रोसेसमध्ये तिला तिच्या नवऱयाची तर साथ होतीच, पण आपल्या सुनेला यशस्वी पाहण्यासाठी, तिच्या आयुष्यात आलेल्या आजपर्यंतच्या दुःखांमधून तिने निवडलेल्या छंदाच्या व्यावसायिक माध्यमातून आनंद मिळावा यासाठी तिच्या सासू-सासऱयांची मोलाची साथ लाभत आहे.

ऐन तारुण्यात काळोखाच्या सावलीत आयुष्य जगत असताना आज मात्र गोखल्यांच्या घरी भक्तीचे आयुष्य सुरक्षित आहे, असे ती सांगते. ‘थ्री चिअर्स’ या तिच्या यूटय़ूब चॅनलचे सबक्रायबर्स व फॉलोअर्स वाढत आहेत. भक्ती कधीही खचली नाही, तर प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरी गेली. आज जिद्दीने तिचे आयुष्य सकारात्मक दृष्टीने जगत आहे.

[email protected]

(लेखक युटय़ुब शेफ आहेत)