संस्कृती सोहळा – वाफधावणी

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भारतीय कृषी संस्कृतीत मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अनेक विधी विधान करण्याची परंपरा चालत आली आहे. समाजातील सजीव नात्यागोत्यांबद्दल जसा कृतज्ञ भाव व्यक्त केला जातो, तसाच गुरेढोरे, पशूपक्षी, इतकेच नव्हे तर कृषी कर्म करीत असताना उपयुक्त असणारी निर्जीव हत्यारे, अवजारे, यंत्रे,वाहने याविषयी सुध्दा कृतज्ञता व्यक्त केली जाते. यानिमित्ताने लोकसंस्कृतीचे आणि लोकसाहित्याचे मनभावन दर्शन होते. यानिमित्ताने पारंपरिक गीते, आरत्या, ओव्या, म्हणी, उखाणे, यांनी लोकसाहित्याचे अंतरंग समृद्ध केले आहे. ‘वाफधावणी’ हा असाच एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी. आधुनिकतेचे वारे प्यायलेल्या सध्याच्या संगणक युगात कृषी संस्कृतीतील हे विधी प्रथा दुर्मीळ होत आहेत.

मढे झाकुनिया करिती पेरणी,

 कुणबियाची वाणी लवलाहे?

“योग्य कर्तव्यकर्म तत्परतेने योग्य वेळी करावे लागते’’ हे विचारसूत्र सांगताना जगद्गुरू संत तुकोबारायांनी कृषी संस्कृतीतील शेता-वावरातील पेरणीचे अनन्यसाधारण महत्त्व विषद केले आहे. कुणबी अर्थात शेतकरी पेरणीविषयी किती दक्ष असतो, हे सांगताना तुकोबाराय म्हणतात शेतकऱ्याच्या घरातील कुणी मेले असले तरी त्याचे प्रेत झाकून ठेवतात आणि आधी पेरणी करायला धावतात. पेरणीला शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. पेरणीची वेळ साधली नाही तर त्याला अपेक्षित धान्य मिळत नाही.

कृषी संस्कृतीत पेरणीच्या अखेरच्या दिवशी तिफणीची भक्तिभावाने पूजा केली जाते. यालाच ‘वाफधावणी’ असे म्हणतात. रब्बी किंवा खरीपाच्या या दोन्ही हंगामात पेरणी केली जाते तेव्हा ‘वाफधावणी’ हा विधी सर्व ठिकाणच्या कृषक समाजात केला जातो. तिफणीचे फारोळे (फण, दाते) जमिनीत खोलवर जावेत आणि चाडय़ातून टाकलेले बी नळय़ावाटे खाली जमिनीत खोलवर पडावे, यासाठी तिफणीच्या खोडावर भार पडण्यासाठी ओल्या मातीचा पेंड बांधला जातो. या पेंडाला ‘भारा’ किंवा ‘लोधा’ असे म्हणतात. ज्या दिवशी पेरणी संपते त्या दिवशी पूजा करून तिफण सोडली जाते. चाडे, नळे, जुपण (एठण) सोडले जाते. जुंपणात (एठणात) वाधीची वाती असेल तर तिला तेल पाजले जाते. चाडे सोडून त्याला तेल-सेंदूर लावला जातो. जू, दांडय़ा, खोड यांना गेरू आणि चुना लावला जातो. नळे स्वच्छ करून ठेवले जातात. नळय़ांच्या वाटय़ा काढून ठेवल्या जातात. तिफणीच्या या सर्व भागांची बेला-फुलाने पूजा केली जाते. या पूजेसाठी कनकीचे दिवे केले जातात. कनकीचेच नांगर, वखर, जू, दांडय़ा, खोड, चाडे, नळे, फारोळे, फळे केले जातात. पेरणीच्या काळात तिफणीच्या खोडावर बांधलेल्या ओल्या मातीचा पेंड सोडून त्याचा ओटा तयार करतात. ओटय़ासमोर कच्च्या खापराचे पाच वाडगे ठेवले जातात. रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी या गाडग्यात गहू भरतात, तर खरिपाच्या वेळी ज्या भागात ज्वारी पेरतात तेथे गाडग्यात ज्वारी भरतात. ओटय़ावर ढेकळांच्या पाच लष्म्या मांडतात. या लक्ष्मीची बेल, फुले, गंध, अक्षता वाहून पूजा केली जाते. नारळ फोडून आरती केली जाते. ही पारंपरिक आरती अशी –

आरती ओवाळू तिफणी, नंदी जुपले दोन्ही

आरती ओवाळू…. ।। धृ ।।

वार बुधवार पाहुणीया कुणबी बाभूळ तोडी

खोड काटून छाटून देले सुताराच्या हाती

डबा त्या सुतारानं दोरं लावून चवकून

अशी तासली वाकसानं, भोक पाडून किकरानं,

उभी तिफण संगीन, आरती ओवाळू…।। 1।। हंकाराच्या टोचल्या दांडय़ा, तीन फारोळे तीन देव,

त्या फारोळय़ा लागुणीया, असे भिडविले तीन फणं, काचकोराचं पानी देऊन आनी काढली

त्यानं वर इचाराचं रुमणं टोचून,

उभी साय संगीन तिफन,

आरती ओवाळू… ।। 2।।

तिन्ही फारोळय़ावर, तीन नळय़ांचा सुमार,

वर्ही चाडं रुबाबदार, ब्रह्मांड आवळीलं एठणानं पेंड बांधून वजनदार, पेरणीला झाली तय्यार चामडय़ाला खोळाची वटी, लक्ष्मी पेरते मुठमुठी, आरती ओवाळू… ।। 3 ।।

जुपनं जुपलं नवलाचं, कासरा लावून बैलास,

शिवळा बैलाच्या कचाटय़ात, जू ठेवलं बैलाच्या खांद्यास,

इळतीची काठी हातात, पुरानी तिच्या ढुंगणात आरती ओवाळू… ।। 4 ।।

पूत धरणीचा भारी, घेऊन भरारी जीवाच्या वढी,

तिफणकारी जातीचा नंदी, तास काढलं जोसात, मोठय़ा दिमाखात, काळय़ा मायच्या हुरदात बी पडते तासोतासी, पेरा पेरणारणीचा भारी जीवाच्या कहारी, देव ब्रह्मा जमिनीखाली, आरती ओवाळू… ।। 5 ।।

तिफण चालते झरझर, वखर तिचा देर, तिफण हाय गडय़ा सती, एक डवरं तिचा ल्योक तिफण हाये गडय़ा अवकासर, नागर तिचा भरतार, आरती ओवाळू…. ।। 6 ।।

झोपडी बांधुनिया पेडीची, कडबा लावून त्याशी, सभा बसली देवाची, पाची पांडवाची, निवद करूनिया पोळीचा, वर्ही भात साळीचा, जे तू जे देवा, सदाशिवा इस्तु करून या गवरीचा, उद घालू राळाचा, आरती ओवाळू… ।। 7 ।।

शेंदूर लावूनिया चाडय़ाला, काव लावा खोडाला झुली घालुनया बैलाला, घागरमाळा बांधा गळय़ाला, वाफ धावली तेथून, शिंग डफडे लावून तिफण आली घरा कारण, आरती ओवाळू… ।। 8।।

(संदर्भः मराठय़ांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास, संपादकः डॉ. साहेब खंदारे)

या पारंपरिक आरतीनंतर काही ओव्याही म्हटल्या जातात. रानावावरात अशी पूजाअर्चा आणि आरती झाल्यावर पेरणी केली जाते व त्यानंतर तिफणीला बैलगाडीत बसवून वाजत-गाजत घरी घेऊन येतात. घरी आल्यावर पुन्हा तिफणीची पूजा केली जाते आणि पेरणीच्या कामात सहभागी असलेल्या सर्वांना जेवण दिले जाते. अनेक वेळा या जेवणासाठी गावातील सहकाऱ्यांसह पै-पाहुण्यांनाही आवतन दिलेले असते. या जेवणाला ‘वारतं’ असं म्हटले जाते. पश्चिम महाराष्ट्रात याला ‘पैरा’ असे म्हणतात. वारत्याचे किंवा पैऱ्याचे जेवण दिलेल्या दिवशी रात्री घरातील आणि गावातील स्त्रिया मिळून गाणी म्हणतात. यातली काही गाणी अशी…

राज्यान् परजा मिळून दोघं, कऊल घेऊ कऊल घेऊन SS, नांगर वखर धरून यानं हानली हो तिफणSS ।। धृ।।

बळीराजाचे तीन लेक, फारोळे तीन या तिफणी कारण, नांगर वखर धरून यानं हानली हो तिफणSS, साईत्री, लक्ष्मी, पारबती नळय़ा संगीन, या तिफनी कारनं नांगर वखर धरून यानं, हानली हो तिफण …।। 1।।

अशा प्रकारे कृषी संस्कृतीत शेतकरी आपल्या शेतात ‘वाफधावणी’ हा विधी साजरा करतो. महाराष्ट्रात सर्वत्र हा कृषी विधी आढळतो.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र लोककलेचे अभ्यासक आहेत.)