राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ

“भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत”, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सत्तेतील गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे नाही. भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रचंड वाद आहेत, तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने हे सरकार पाच वर्ष कसे चालणार हा कुतुहलाचा प्रश्न आहे.”

ते म्हणाले, “आता शिंदेसेनेलाच गिळंकृत करण्याचा डाव भाजपाने आखला असून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत. पण भाजपाचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते शिंदेना कितपत दाद देतील हे पहावे लागेल.”