
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याला लोकशाही आणि संविधानाची थट्टा असल्याचे म्हटले असून, पश्चिम बंगालमध्ये हा दिवस साजरा केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आणि संवैधानिक मूल्यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.
याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “केंद्र सरकार म्हणते की, यावर्षी आपातकालाच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाईल. मी संविधान हत्या या शब्दप्रयोगावर आक्षेप नोंदवते. संविधान हे आपल्या अधिकारांचा आधार आहे, लोकशाहीची जननी आहे. ते (भाजप) याला संविधान हत्या कसे म्हणू शकतात?” त्यांनी केंद्र सरकारवर संविधान आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा अनादर केल्याचा आरोप केला.
ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, जे लोक संविधानाचा आदर करत नाहीत, ते आता त्याच्या नैतिकतेची भाषा करत आहेत. हा ढोंगीपणा आहे. जे लोक दररोज लोकशाही आणि संविधानिक रचनेवर हल्ला करतात, त्यांच्याकडून लोकशाहीवरील व्याख्याने ऐकण्याची आमची इच्छा नाही,” असे त्या म्हणाल्या.