
तेलंगणामध्ये सलग दोन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अख्खा पक्ष भाजमध्ये विलीन करण्याचा डाव पक्षातीलच काही नेत्यांनी आखला असल्याचा आरोप बीआरएसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला भाजपमध्ये विलीन करण्याचा डाव पक्षामधील काही लोकांनी आखला होता. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात मी तुरुंगात असताना यासंदर्भातील प्रस्ताव आपल्यासमोर आणण्यात आला होता. मी त्याला कडाडून विरोध केला, मात्र त्यासाठी अजूनही ते प्रयत्न करत असल्याचे सांगत के. कविता यांनी आपले भाऊ आणि ‘बीआरएस’चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
बीआरएस म्हणजे तेलंगणातील लोकांसाठी श्रीरामरक्षा आहे. पण तेलंगणमधील संसाधने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवर नियंत्रण ठेवण्याऐवजी ‘बीआरएस’ला भाजपच्या हाती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप नेत्यांची रुग्णालये उघडणारे ते लोक कोण आहेत? भाजपची विचारसरणी बीआरएसमध्ये कोणी आणली?, असा सवाल करत के. टी. रामाराव यांच्या नेतृत्वावर के. कविता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केसीआर यांना लिहिलेले पत्र फुटले
कविता यांनी पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना एक पत्र लिहिलेले होते. या पत्रात त्यांनी पक्ष आतूनच कमकुवत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असल्याचे म्हटले होते. हे पत्र फुटल्याबद्दल कविता यांनी आक्षेप घेतल्याने बीआरएसमधील अंतर्गत मतभेद समोर आले.
पक्ष वाचविण्यासाठी जेलमध्ये जाईन
भाजपशी संगनमत करून माझा निवडणुकीत पराभव करण्यात आला. यापुढे मी गप्प बसणार नाही. बीआरएस पक्षाला वाचविण्यासाठी मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असा इशारा के. कविता यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला आहे.