सीबीएसईच्या दहावी-बारावी निकालात मोठा बदल, गुणांची टक्केवारी, डिस्टिंक्शन जाहीर करण्याची पद्धत बंद

दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची वाट पाहणाऱया विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या निकालात 2024 मध्ये होणार्या परीक्षेपासून बदल करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालामध्ये श्रेणी, डिस्टिंक्शन दिले जाणार नाही. याशिवाय एकूण टक्केवारीही सांगितली जाणार नाही. सीबीएसईने श्रेणी, डिस्टिंक्शन तसेच एग्रीगेट गुण हे प्रकारच रद्द केले आहेत.

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी सांगितले, दहावी-बारावीच्या निकालात श्रेणी, डिस्टिंक्शन आणि एग्रीगेट गुण दर्शविले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असल्यास त्यातील बेस्ट पाच विषय निवडण्यात येतील. हे विषय निवडण्याचे अधिकार विद्यार्थी ज्या शाळा- कॉलेजमध्ये प्रवेश घेतील त्यांना असतील तसेच नोकरीसाठी विद्यार्थी ज्या ठिकाणी अर्ज करतील ते बेस्ट पाच विषयांची निवड करतील. सीबीएसई बोर्ड यापुढे विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर करणार नाहीत, तसेच निकालातही टक्केवारी दर्शविणार नाहीत, असेही भारद्वाज म्हणाले.

– सीबीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील.

–= प्रकल्प सादरीकरण आणि अंतर्गत मूल्यमापन 1 जानेवारीपासून सर्व मान्यताप्राप्त शाळांमधून सुरू होणार आहे.

– दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, मात्र अद्याप बोर्डाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेले नाही.