
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने कमी होताहेत, पण शहरात नेमके काय नवीन उभे राहतेय हा प्रश्नच आहे. मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. वाहतूककोंडी होते. पावसात पाणी साचते. पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील घाटकोपर येथे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबई मराठी माणसाला सहजासहजी मिळालेली नाही, पण आज मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे.
पेटंट कार्यालयाचे मुख्यालय मुंबईतून थेट दिल्लीला हलवले गेले, बीकेसीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रदेखील रातोरात हलवले. 26/11चा हल्ला झाल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल मरीन पोलीस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डस केंद्र स्थापन करण्याचे ठरवले. मात्र आता ते गुजरातमध्ये नेले. अशा प्रकारे मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.