
ऑनलाईन जुगार, शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. याच तणावातून एका तरुणाने आपल्या दोन वर्षांचा चिमुकल्याला आणि पत्नीला विष दिलं आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऑनलाईन जुगारामुळे एका कुटुंबाचा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाराशिव तालुक्यातील लक्ष्मण मारुती जाधव (29) याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रमी खेळायचा. या ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज जमा झाले होते. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि मुलासह जीवन संपवंल. सोमवारी (16 जून 2025) सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने गावकर्यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. लक्ष्मण जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्याला दोन वर्षाचा मुलगा होता. गावकर्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. दरम्यान, त्याने रविवारी (15 जून 2025) रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारलं आणि त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व शक्यता गृहीत धरुन तपास करत आहेत. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.