
शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणी काही सुटायला तयार नाहीत. ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कटऑफ दिसत नसल्यामुळे प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 जून ऐवजी 30 जूनला जाहीर होणार असून सुधारित वेळापत्रक काढण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21 लाख 23 हजार 40 जागा उपलब्ध असून प्रवेशासाठी 12 लाख 71 हजार 201 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी संस्थानिहाय कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यासाठी 60 हजार 487 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता 20 लाखांपेक्षा अधिक जागांसाठी उर्वरित 12 लाख विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे.
शिक्षण विभागाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार 27 जूनपासून कॉलेजनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना 27 जूनपासून आपल्याला प्रवेश मिळेल असे वाटत होते. पण कोणाचीही मागणी नसताना आणि अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन प्रक्रिया राबवणे सोपे नसताना शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रवेशाचा हा सावळागोंधळ आणखी किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एकही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबवणे शक्य होत नाही का, अशी शंका निर्माण होते. त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात 30 जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले जाणार आहे; परंतु, 30 जून ही तारीख तरी पाळता येणार आहे का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.