
महाराष्ट्रात थंडावलेल्या मान्सूनने ईशान्य हिंदुस्थानात थैमान घातले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हाहाकार उडाला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीममधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. या संकटात हिंदुस्थानी लष्कराने ‘देवदूत’ बनून पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. हवाई दलानेही बचाव मोहिमेत तत्परता दाखवली.
ईशान्येकडील राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या 15 हून अधिक जिह्यांतील 78,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे व फेरी सेवांवर परिणाम झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मणिपूरमध्ये हजारो कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली असून पूरग्रस्त भागात लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे जवान पूरग्रस्तांना मदत करून सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. पावसाची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. पुराचे वृत्त कळताच आम्ही युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले, अशी माहिती आर्मी इंजिनीअर टास्क पर्ह्स कमांडर कर्नल गुणव्रत भिवगडे यांनी दिली. मागील 48 तासांपासून लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे.
हवाई दलही मदतकार्यात सक्रीय
आसाम-अरुणाचल सीमेवर बोमजीर नदीत अडकलेल्या 14 जणांना हवाई दलाच्या जवानांनी वाचवले. नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने धाडसी बचाव मोहीम हाती घेतली आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात यश मिळवले.
मुसळधार पावसाचा विविध राज्यांत फटका
n मणिपूरमध्ये 48 तासांत पूर आणि भूस्खलनामुळे 3,802 लोक प्रभावित झाले. तसेच 883 घरांचे नुकसान झाले आहे. लष्कराने इम्फाळ पूर्व व पश्चिमेकडील सुमारे 1500 लोकांना वाचवण्यात यश मिळवले. नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या आठ तुकडय़ा व चार राखीव तुकडय़ा तैनात आहेत.
n अरुणाचल प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला.
n उत्तर सिक्कीमच्या विविध भागांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने सुमारे 1,500 पर्यटक अडकले होते. मंगन जिह्यात एक गाडी तिस्ता नदीत पडल्याने एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. तसेच आठ जण बेपत्ता झाले.
n इम्फाळ नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे.