जैसवाल-अय्यर दोघेही संघात असायलाच हवे होते, माजी फिरकीवीर मनिंदर सिंह नाराज

9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघात यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही असायलाच हवे होते. या दोघांनाही संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर माजी फिरकीपटू मनिंदर सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही दोन्ही वे संघात दिसली नाहीत म्हणून मी खूप निराश झालोय. जैसवाल हा कोणत्याही फॉरमॅटसाठी सज्ज आहे आणि त्याला कोणत्याही संघात संधी मिळायला हवी होती. अय्यरबाबत बोलायचे तर मला समजत नाही की त्याला पुनःपुन्हा का वगळले जातेय. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याने संघासाठी जबरदस्त कामगिरी केलीय. पण अनेक वर्षांपासून हेच सुरू आहे. काही वर्षे गेल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाईल आणि मग कुणा दुसऱया खेळाडूकडे पाहिले जाईल. असे नको व्हायला.

शुभमन गिल हा हिंदुस्थानचा तिन्ही फॉरमॅटचा भावी कर्णधार आहे. म्हणूनच त्याला उपकर्णधार पद देण्यात आले असल्याचे सिंह म्हणाले. सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये फक्त दोन वर्षेच कर्णधारपदी राहू शकतो. त्यामुळे गिलला आतापासून उपकर्णधार बनवून त्याला नेतृत्व पदासाठी तयार करणे योग्य असल्याचेही ते म्हणाले.