
अनंत चतुर्दशीनिमित्ती (06 सप्टेंबर 2025) राज्यभरात 10 दिवसांच्या गणरायाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. पुण्यातील विसर्जन मिरवणुका 31 तासानंतर थांबल्या. मुंबईमध्ये जवळपास सर्व गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. मात्र लालबागचा राजा अजूनही विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहे. एकीकडे धुमधडाक्यात राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र, दुसरीकडे गणेश विसर्जना दरम्यान विविध घटनांमध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच 11 व्यक्तींचा अजूनही शोध सुरू आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडत असतात. प्रामुख्याने पुणे आणि मुंबईमध्ये गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, याच विसर्जनादरम्यान राज्यात विविध घटनांमध्ये 5 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच 11 व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.