ओवैसींसमोर शपथ घेणार नाही, भाजप आमदार टी राजा सिंह यांचा निर्णय

तेलंगाणाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून इथे काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता नवनियुक्त आमदारांचा शपथविधी होणार असून तेलंगाणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून एमआयएम पक्षाचे अकबरुद्दीन ओवैसी यांची निवड करण्यात आली आहे. ते शनिवारी हंगामी अध्यक्षाची शपथ घेणार आहेत. मात्र ओवैसी अध्यक्ष पदावर असेपर्यंत आपण आमदारकीची शपथ घेणार नाही असे भाजपच्या टी राजा सिंह यांनी जाहीर केले आहे. के.चंद्रशेखर राव हे एमआयएमला घाबरायचे आणि रेवंत रेड्डी हे देखील एमआयएमला घाबरत असल्याचा आरोप टी.राजा यांनी केला आहे. काँग्रेसने भीतीपोटी ओवैसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नेमल्याचा आरोप टी.राजा यांनी केला आहे.

टी राजा सिंह यांनी म्हटले की, ‘नव्या सरकारचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नियुक्तीनंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, रेवंत रेड्डी म्हणायचे की AMIM, BJP आणि BRS हे सगळे आतून एक आहेत. आज जनतेला कळले आहे की कोण कोणासोबत आहे. ?

टी राजा सिंह म्हणाले, ‘अकबरुद्दीन यांना हंगामी अध्यक्ष बनवले आहे, 15 मिनिटांत 100 कोटी हिंदूंना मारण्याची धमकी देणाऱ्या, गोमांस खाण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्याकडून मी शपथ घेणार नाही. आम्ही शपथविधीवर बहिष्कार टाकू. विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही शपथ घेऊ.

“काँग्रेसचे एन उत्तम कुमार रेड्डी, तुम्माला नागेश्वर , बीआरएसचे दानम नागेंद्र ,तलासनी श्रीनिवास यादव हे टर्म आमदार राहिलेले आहेत. पोचाराम रेड्डी यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. असं असतानाही ओवैसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्याचा निर्णय हा राजकीय निर्णय होता असे काँग्रेसचे मंत्री डी श्रीधर बाबू म्हटले.