
गुरुवारी ढगफुटीसदृश झालेल्या पावसानंतर काहीसा दिलासा मिळाला असतानाच, जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाचे धुमशान सुरू होते. दिवसभर कधी संततधार, तर कधी रिपरिप सुरू होती. राधानगरीसह कुंभी, कासारी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी नऊ ते दहा फूट वाढली. सायंकाळी सहापर्यंत पंचगंगा, कासारी, भोगावतीसह दूधगंगा नदीवरील तब्बल तेरा बंधारे पाण्याखाली गेले असून, आणखी बंधारे पाण्याखाली जाऊन मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. अगोदरच ओलाचिंब झालेला कोल्हापूर जिल्हा आता गारठल्याचेही दिसून येत आहे.
कोल्हापूर जिह्यात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. आज मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुपारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच ‘रेड अलर्ट’ही देण्यात आला होता. त्यानुसार ठिकठिकाणी जोरदार, तर कुठे मुसळधार पाऊस झाला.
धरणक्षेत्रात अतिवृष्टी तसेच धरणांतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पात्रात झपाटय़ाने पाणीपातळी वाढत आहे. पंचगंगा नदीवरील शहरातील राजाराम बंधाऱ्यावर आठवडय़ात दुसऱ्यांदा पाणी आल्याने सकाळपासून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
राधानगरीतून 2500 क्युसेकने विसर्ग
राधानगरी धरणाचा विसर्ग एक हजार क्युसेकने वाढवून 2500 क्यूसेक करण्यात आल्याने भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या तसेच कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युतगृहामधून 300 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.