
जिह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर आज पुन्हा दमदार पाऊस झाला. सकाळी जोरदार पावसानंतर दुपारपर्यंत उघडीप दिली होती. मात्र, दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव तालुक्यातील पाऊस सुरूच राहिला. उघडीपीमुळे खरिपाच्या मशागतींना वेग आला होता; मात्र पावसाने पुन्हा शेतीची कामे ठप्प झाली. दरम्यान, उद्या (दि. 13) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्याच्या विविध भागांत पाऊस होत असताना जिह्याला पावसाने उघडीप दिली होती. परंतु, दोन दिवस वादळी वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पावसाच्या सरी बरसल्यानंतर दहा वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र, उष्म्यात वाढ झाली होती. दुपारी साडेतीननंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी मोठय़ा असल्याने काही वेळातच पाणीच पाणी झाले. वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, तांदूळवाडी, बहादूरवाडी, बोरगाव, नेर्ले या भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर राहिला. तेथील बहुतांशी गावात पाऊस सुरूच राहिला. मिरज तालुक्यातील तुंग, कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दूधगाव, मौजे डिग्रज, नांद्रे परिसरात जोराच्या पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठेएकंद, कुमठे तसेच कवठेमहांकाळमधील बहुतांशी गावांत हलकासा पाऊस झाला.
सांगली शहरातील वाहतूक विस्कळीत
सांगली शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी सुरू झालेल्या जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टॅण्ड परिसर, मार्केटयार्ड परिसर, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौकात पाणी साचले होते. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.