हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तणाव; सुरक्षा दलाने घुसखोरीचा डाव हाणून पाडला

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. तसेच हिंदुस्थान-चीन सीमेवरही तणाव आहे. त्यातच आता हिंदुस्थान- म्यानमार सीमेवरही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षा दलांना अरुणाचल प्रदेशच्या लोंगडिंग जिल्ह्यात पोंगचौ सर्कलवर संशयास्पद हालचालींबद्दल माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी गुरुवारी सीमावर्ती भागात गस्त सुरु केली.

संरक्षण मंत्रालयानुसार, घनदाट जंगलातून जाताना सुरक्षापथकांना संशयास्पद हालचाली दिसल्या. परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्यानंतर सुरक्षापथकांनी त्यांना हटकलं. त्यावेळी त्या अज्ञातांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असताना अज्ञात व्यकती आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन म्यानमारमध्ये पळून गेले. आसपासच्या घनदाट जंगलाचा फायदा घेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्ती सीमापार करण्यात यशस्वी ठरले.

याआधी 14 मे रोजी दक्षिण मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात असम रायफल्ससोबत झालेल्या चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. चंदेल जिल्ह्याची सीमा म्यानमारला लागून आहे. या घटनांमुळे सीमभागात सुरक्षा गले सतर्क झाली आहेत. प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मिजोराम या चार राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. त्यामुळे या राज्यातील सीमा भागातील सुरक्षा दल सतर्क आहे.