कल्याण-डोंबिवलीत अघोषित रिक्षा दरवाढ; रिक्षाचालकांच्या मनमानीने प्रवाशांच्या खिशाला कात्री

फाईल फोटो

कल्याण-डोंबिवलीत रिक्षा प्रवास करणे सामान्य प्रवाशांसाठी अधिकाधिक खर्चिक ठरत असून अलीकडे रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ लागू करत प्रवाशांकडून मनमानीपणे पैसे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रवाशांकडून सरसकट तीन, पाच ते दहा रुपये अधिक आकारले जात आहेत. रिक्षाचालक बेकायदा प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असतानाही पोलीस, आरटीओ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात बहुतांश नागरिक ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये नोकरी-व्यवसायासाठी दररोज प्रवास करतात. स्टेशनपासून दूर राहत असल्याने त्यांना स्थानिक वाहतुकीसाठी रिक्षांवरच अवलंबून राहावे लागते. सार्वजनिक वाहतूक वेळेवर उपलब्ध न झाल्याने शेअरिंग रिक्षा ही त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय ठरते. परंतु रिक्षाचालक प्रवाशांच्या या अडचणीचा गैरफायदा घेत असून याआधीही 2022 मध्ये त्यांनी मनमानी भाडेवाढ केली होती. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी स्टेशन परिसरात अधिकृत दरफलक लावले होते. मात्र काही दिवसांतच हे फलक गायब झाले आणि भाडेवाढ पुन्हा मूळ पदावर आली.

यावेळीही सीएनजीच्या दरवाढीचे कारण देऊन रिक्षाचालकांनी नव्याने दरवाढ केली आहे. दुपारच्या वेळेत, पावसाळ्यात किंवा लांबपल्ल्याचा प्रवास करताना शेअरिंग रिक्षा सहज मिळत नसल्याने प्रवासी मीटर रिक्षांचा पर्याय निवडतात. मात्र आता मीटर रिक्षांचे दरही भरमसाठ वाढवले असून प्रवाशांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे रिक्षा भाडेवाढीवर तातडीने अंकुश घालावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

भाडेवाढीचा वरवंटा

पूर्वीचे भाडे       सध्याचे भाडे      भाडेवाढ
१५ रुपये          १८ रुपये         ३ रुपये
२२ रुपये          २५ रुपये        ३ रुपये
४० रुपये          ५० रुपये        १० रुपये