
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अतिवृष्टी होऊन दहा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. सरसकट पंचनामे सरकार करत नाही, असा आरोप करत माकणी थोर येथील सरपंच राहूल माकणीकर यानी निलंग्याचे तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैशाचे बंडल फेकून सरकारचा निषेध केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औराद शाहजानी येथील तेरणा व मांजरा संगमावर जावून नुकसानीची व पूर पहाणी केली. परंतु ठोस असे अश्वासन न दिल्यामुळे व निलंगा तालुक्यातील दहा मंडळा पैकी तीनच मंडळ सरसकट नुकसानभरपाईमध्ये घेत आहे. आम्हाला तुटपुंजी मदत नको, असा संताप व्यक्त करत माकणी थोर येथील सरपंच राहूल माकणीकर यांनी तससिलदार यांच्या दालनात जावून पैशाचे बंडल तहसिलदाराच्या अंगावर फेकले व सरकार व महसूल प्रशासन यांचा जाहीर निषेध केला, असे सरपंच राहूल माकणीकर यांनी सांगितले. नुकसानभरपाईमध्ये सरकार व महसूल प्रशासन दुजाभाव करतंय, असा आरोपही त्यांनी केला.
यानंतर सरपंचावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिस सुधीर सुर्यवंशी करत आहेत. तहसिलदारांच्या अंगावर पैशाचे बंडल टाकल्यामुळे निलंगा तहसिल अंतर्गत सर्वच तलाठी मंडळातील तलाठी मंडळअधिकारी यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. परंतु तात्काळ पोलिसांनी सरपंच राहूल माकणीकर यांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे. तरी देखील काम बंदची पुकार महसूल प्रशासनाने करणे योग्य नाही, असा आरोप जानकार मंडळीतून होत आहे.