सख्या तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून

निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या तीन भावांनी संगणमत करून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खुन केल्याची घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे

उस्तुरी येथील मयत सुरेश बिराजदार यांचा व सख्खे भाऊ बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांचा शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता, या विषयावर अनेकदा यांची भांडणे झाली होती व एकमेकांविरोधात गुन्हे ही दाखल झाले होते‌ . गावातील अनेकजणांनी या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण यातील कोणीही ऐकण्यास तयार झाला नाही. यातच दिनांक 16 जानेवारी रोजी मयत सुरेश बिराजदार, मुलगा गणेश व साहील शेतात काम करीत असताना आरोपी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांनी संगणमत करुन लाठ्याकाठ्यांनी अचानक येऊन मारहाण चालू केली. या तिघांनी केलेल्या जब्बर मारहाणीत सुरेश बिराजदार (50) व मुलगा साहिल वय 22 वर्षे यांचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला असुन त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. या घटनेची माहिती पोलीसांना कळताच उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजु हिंगमिरे, बळीराम म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार,लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.