‘सागर कन्या’ जग जिंकून गोव्यात परतल्या, 8 महिन्यांत 50 हजार किलोमीटरचा सागरी प्रवास

दृढता, कौशल्य आणि निर्धार यांचा मेळ घालत आणि नवा इतिहास घडवत दोन महिला नौदल अधिकाऱ्यांनी आयएनएसव्ही तारिणीवरील सागरी मोहीम यशस्वी केली. लेफ्टनंट कमांडर रुपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के. या दोघी आठ महिन्यांमध्ये तब्बल 50 हजार किलोमीटरचा सागरी प्रवास करून परतल्या. संरक्षण मंत्री राजस्थान सिंग यांनी वास्को मोरमुगाव बंदरात दोन्ही धाडसी महिलांचे आणि त्यांच्या जहाजाचे स्वागत केले. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवणारे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठीदेखील उपस्थित होते. तुम्ही केवळ पृथ्वीभोवती फिरला नाहीत तर प्रत्येक देशवासीयाच्या हृदयात स्थान निर्माण केले. तुम्ही देशाच्या शूरवीर कन्या आहात, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी दोघींचे कौतुक केले.

यावेळी बोलताना लेफ्टनंट कमांडर दिलना के म्हणाल्या, ‘हो, आम्ही साध्य केले. 2 ऑक्टोबर रोजी, आम्ही खूप आशा आणि धैर्याने गोवा सोडला. आज आम्ही इथे तुमच्यासमोर जिवंत आणि ताकदीने उभे आहोत. आम्ही तिरंगा आणि नौदलाचा ध्वज जगभर फडकवला. जिथे जिथे उतरलो तिथे आमचा जयजयकार झाला. आयुष्याच्या या प्रवासात आम्ही अभिमानाने देशाचे प्रतिनिधित्व केले.’

लेफ्टनंट कमांडर रुपा ए. म्हणाल्या, या आठ महिन्यांत सातजन्म जगून झाले. समुद्राचे जग म्हणजे जणू एक ग्रह. पण हे जग पूर्ण वेगळे आहे. हा देदीप्यमान प्रवास मी माझ्या कुटुंबीयांना अर्पण करते. पृथ्वीला अंत नाही आणि या प्रवासातील आव्हानांनाही अंत नाही.