
गेल्या 15 वर्षांत मुंबईतील रेल्वे मार्गांवर मृत्यू झालेल्यांपैकी जवळपास एकतृतीयांश मृतदेहांची ओळखच पटलीले नाहिये. या मृतदेहांची ओळख न पटल्याने त्यांच्या मृतदेहाचा ताबा कुणालाच देता आलेला नाहिये. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
माहिती अधिकारातून माहिती मिळाली आहे की, 2009 ते 2024 या काळात मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गांवर ट्रेनमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेल्यांपैकी 14,000 हून अधिक लोकांची ओळख पटलेली नाही. बहुतांश हे मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि खोपोली (मध्य रेल्वे), सीएसएमटी ते पनवेल (हार्बर मार्ग) आणि चर्चगेट ते डहाणू (पश्चिम रेल्वे) या मार्गांवर झाले आहेत.
एकूण 46 हजार 969 मृतांपैकी 14 हजार 513 (31%) मृतदेहांची ओळख पटवता आली नाही. महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केला पण तरी ते सापडले नाहीत.
रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवणं फार जिकरीचं असतं अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच कधी कधी मृतदेह इतका छिन्न विच्छिन्न होतो की त्यांची ओळखही पटवता येत नाही. कधी तर त्यांच्याकडे ओळखपत्र आणि मोबाईल फोनही नसतो त्यामुळे ओळख पटवणं आणखीनच आव्हानात्मक होऊन जातं असं पोलिसांनी सांगितलं.