मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; पटोलेंचा गंभीर आरोप

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे तर सरकार नेमके काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट नाही. दोन्ही समाजात सुरु असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरुन सुरु असलेला हा धुमाकुळ सरकारने थांबवावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकरी, बेरोजगार तरुण, सर्वसामान्य जनतेच्या भावना कळत नाही पण जनतेला भेडसावत असलेले मुळ प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. कोण काय बोलतो हे काँग्रेस व महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाचे नाही व त्यात कोणाला स्वारस्य नाही.

भाजपा हा आरक्षण विरोधी पक्ष असून देशाचे पंतप्रधानच गरिबी ही जात असल्याचे सांगून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राने काय पाप केले आहे का?

राजस्थान व छत्तिसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास 450 रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही 450 रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात 450 रुपयांना सिलिंडर देत का नाही? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? ही सर्व बनवाबनवी आहे, उज्ज्वला गॅस योजनेत केवळ 20 टक्के सिलिंडर रिफील केली जातात ही योजना फेल गेली आहे पण उज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही पण 2014 पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करुन नफा कमावणे हे भयावह आहे.

‘पनवती’ ट्विटवर एवढा वाद कशाला?

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पनवती म्हटलेले नाही. ते देशाचे आदरणीय पंतप्रधान आहेत. सोशल मीडियावर पनवती हा शब्द मागील दोन तीन दिवसांपासून ट्रेंड होत आहे, पनवती म्हणजे अहंकार व हा अहंकार म्हणजे पनवती गेली पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे, तोच संदर्भ ट्विटमध्ये आहे. भाजपा ते स्वतःवर घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.