Pune News – पोहताना दम लागल्याने तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

तलावात पोहताना दम लागल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली. या घटनेमुळे चारही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

चारही कुटुंब उदरनिर्वाहासाठी चाकण परिसरात आली होती आणि भाड्याच्या खोलीत राहत होती. शनिवारी दुपारी चारही मुलं चाकणजवळील कडाचीवाडी हद्दीतील पाझर तलावात अंघोळीसाठी गेली होती. मात्र पोहताना दम लागल्याने चौघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ उलटला तरी मुलं घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना पाझर तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.