रायगडात उद्यापासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम; 15 दिवस गावागावात, वीटभट्ट्या, दगड खाणींवर सर्च ऑपरेशन

प्रातिनिधीक फोटो

रायगड जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम 1 जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे. ही मोहीम 15 जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. गावागावात, आदिवासी पांडे तसेच वीटभट्ट्या, दगडखाणीवर जाऊन हे सर्च ऑपरेशन करून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञांची टीम फिल्डवर उतरणार आहे.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन सदर मुर्लाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

या ठिकाणी करणार नोंदी

मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे.

डोंबिवलीतील सुविधा केंद्र पुन्हा कार्यरत

डोंबिवली रेल्वे स्थानकानजीकच्या जुन्या विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे या इमारतीतील नागरिक सुविधा केंद्र पालिकेने बंद केले होते. मात्र आता हे केंद्र पुन्हा सोमवारपासून कार्यरत होणार आहे. डोंबिवली पूर्वेतील जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, जुने एलबीटी ऑफिस, मानपाडा रोड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना त्यांचा मालमत्ता कर व पाणी देयकाचा भरणा करण्यासाठी सोयीचे जावे म्हणून महानगरपालिकेने महापालिकेच्या प्रभागांत तसेच महापालिका मुख्यालय, जुने डोंबिवली विभागीय कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत घोकादायक झाल्याने काही दिवस नागरी सुविधा केंद्र बंद होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या सोमवारी 30 जूनपासून सदर नागरिक सुविधा केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे तरी डोंबिवलीच्या ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागातील नागरिकांनी आपला मालमत्ता कर आणि पाणी देयके भरण्यासाठी ‘जगन्नाथ कॉमर्स प्लाझा’ येथे भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.