
अहमदपूर तालुक्यात गेल्या आठवडयात विज गर्जनेसह पडलेल्या वळीवाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या ज्वारी, भुईमूग या पिकांना कोंब फुटले आहेत, तर ज्वारी काळी पडली आहे. भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 889 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला असूनसहा जण जखमी झाले आहेत.
तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच याबाबतचा अहवाल सादर केला जाईल. विशेषतः आंब्याच्या फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. हाडोळती, शिरूर ताजबंद आणि अहमदपूर या मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. अहमदपूर मंडळात तर दोन-तीन दिवसांत 70 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे उन्हाळी पिके आणि फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीची मशागत थांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
या अवकाळी पावसामुळे सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील ऊस पिकाला चांगला फायदा झाला असला तरी, भुईमूग, हायब्रीड ज्वारी, भाजीपाला आणि फळबागा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. घोताळा येथे भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी व शेतमजुरावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या आठवड्याभरातील हा पाऊस शेतीसाठी नुकसानदायक आणि शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. पेरणीची कामे जून महिन्यात सुरू होत असली तरी, पाऊस थांबत नसल्यामुळे शेतीतील कोणतीही कामे पूर्ण झालेली नाहीत. शेतात धसकटे, पळाट्या आणि तुराट्या तशाच असल्याने शेतजमीन पेरणीसाठी तयार नाही. कमी वेळेत ही कामे पूर्ण करायची झाल्यास मजूर टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
उन्हाळी पिके म्हणून रब्बी पिकात ज्वारी , भुईमूग पिके शेतकऱ्यांनी घेतली होती अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे बेहाल केले या पावसामाळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. उभ्या पिकाला मोड फूटून रब्बी हातातून गेली त्यामूळे शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
– संजय पवार, उपसभापती कृषी उत्पन बाजार समिती
शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने शेतकऱ्याच्या मोक्यावर जाऊन तात्काळ पंचनामे करावेत शासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून या आलेल्या नैसगिक संकटात शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी तातडीची मदत करावी.
– बालाजी रेड्डी, शिवसेना जिल्हाप्रमुख