
हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला आझाद मैदानावर जाणारा मोर्चा मराठी माणसाचा असेल. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा भुसा केला. हिंदी सक्तीचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी घरी आलेल्या भुसे यांची राज यांनी हजेरी घेतली. भुसे यांच्या प्रेझेंटेशनने राज यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ते फेटाळून लावत राज यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघेल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. हा मोर्चा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच मोर्चाचा अजेंडा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे राज यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत मोर्चाची 6 जुलै ही तारीख त्यांनी सांगितली. मात्र नंतर एक्स पोस्टच्या माध्यमातून 6 ऐवजी 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघेल, असे त्यांनी जाहीर केले.
तरी भुसे शिक्षण मंत्री झाले ना?
आजवर महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीनुसार आपल्याला पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय होता. त्याच शिक्षण पद्धतीत शिकून आपण मोठे झालो आहोत. असे असताना अचानक ही तिसरी भाषा का लादताय? पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय घेऊन तेच शिक्षण घेऊन दादा भुसे आज शिक्षण मंत्री झाले ना? त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवलेली का, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला.