
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमधील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना पुढील उपचारांसाठी कणकवलीला हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड येथून सहा जण कणकवली मार्गे भिरकोन्डाकडे चालले होते. याच दरम्यान राजापूरमधील हातीवले टोल नाक्यावर कार आली असता उभ्या ट्रकला भरधाव वेगात धडकली. या भीषण अपघातात राजेश शेखर नायडू (35) याच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. गाडीतील अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांना राजापूरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना पुढील उपचारांसाठी कणकवलीला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर घटनास्थळी मदतीसाठी मुन्ना खामकर, राजू कुरूप, नरेन कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर संदीप राऊत दाखल झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच आजूबाजूची मंडळी मदतीसाठी धावून आली.